येवला | प्रतिनिधी
येवला तालुक्यातील कासारखेडा गावात अज्ञात चोरट्यांनी उच्छाद मांडला असून, शेतातील विहिरींवरील विद्युत पंपांच्या केबल तसेच सौर ऊर्जेच्या (सोलर) महागड्या केबलची मोठ्या प्रमाणावर चोरी होत आहे. या सातत्यपूर्ण चोऱ्यांमुळे शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान होत असून परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
चोरीच्या घटनांमुळे शेतकऱ्यांच्या सिंचन व्यवस्थेवर परिणाम झाला असून पिकांना पाणी देणे कठीण बनले आहे. परिणामी खरीप हंगामात शेतकऱ्यांसमोर मोठे संकट उभे राहिले आहे.
या चोरीच्या घटनांमध्ये रामदास गायकवाड, महेश गायकवाड, चांगदेव गायकवाड, दगू गायकवाड, ज्ञानेश्वर गायकवाड आणि बाळासाहेब गायकवाड या शेतकऱ्यांचे नुकसान झाल्याचे समोर आले आहे.
वारंवार होणाऱ्या चोऱ्यांमुळे शेतकऱ्यांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत असून, पोलिसांनी तातडीने तपास करून चोरट्यांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. तसेच ग्रामीण भागात रात्रीच्या गस्तीत वाढ करून शेतमाल व शेतकऱ्यांच्या मालमत्तेचे संरक्षण करण्याची मागणीही नागरिकांकडून करण्यात येत आहे.
