येवला | प्रतिनिधी :
येवला तालुक्यातील कासारखेडा आणि परिसरात अज्ञात चोरट्यांनी धुमाकूळ घातला असून, शेतकऱ्यांच्या शेतातील विहिरीवरील विद्युत पंपांच्या केबल तसेच सौर ऊर्जा (सोलर) यंत्रणेच्या महागड्या केबल कापून चोरी करण्याच्या घटना वाढल्या आहेत. खरीप हंगामाच्या तोंडावर होत असलेल्या या चोऱ्यांमुळे शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात सापडला असून परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

रात्रीच्या अंधाराचा फायदा
चोरटे रात्रीच्या अंधाराचा फायदा घेत शेतांमध्ये प्रवेश करून विहिरीवरील मोटारींच्या कॉपर केबल तसेच सौर ऊर्जा प्रकल्पांच्या केबल कटरच्या साहाय्याने काही मिनिटांत कापून घेऊन पसार होत आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसत आहे.
सिंचन व्यवस्था विस्कळीत
केबल चोरीला गेल्यामुळे पाण्याच्या मोटारी बंद पडत असून पिकांना वेळेवर पाणी देता येत नाही. नवीन केबल खरेदीसाठी हजारो रुपयांचा खर्च करावा लागत असल्याने आधीच निसर्गाच्या लहरीपणामुळे अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांसमोर आणखी एक मोठे संकट उभे ठाकले आहे.
पोलिसांनी गस्त वाढवण्याची मागणी
या चोरीच्या घटनांबाबत स्थानिक पोलिसांकडे तक्रारी दाखल करण्यात आल्या असून, चोरट्यांचा तातडीने शोध घेऊन त्यांच्यावर कठोर कारवाई करावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. तसेच ग्रामीण भाग आणि शेतशिवारात रात्रीची पोलीस गस्त वाढवून शेतकऱ्यांच्या मालमत्तेचे संरक्षण करावे, अशी मागणीही जोर धरत आहे.
वारंवार घडणाऱ्या या चोरीच्या घटनांमुळे कासारखेडा परिसरातील शेतकऱ्यांमध्ये संतापाचे वातावरण असून, पोलिसांनी लवकरात लवकर चोरट्यांना जेरबंद करून या घटनांना आळा घालावा, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
