लोहारा | प्रतिनिधी
केंद्र व महाराष्ट्र शासनाच्या विविध महिला व बालकल्याण योजनांची प्रभावी अंमलबजावणी करणाऱ्या अंगणवाडी सेविकांना अपुऱ्या तांत्रिक सुविधांमुळे मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत असल्याचे चित्र ग्रामीण भागात दिसून येत आहे. अद्ययावत मोबाईल, तांत्रिक सुविधा आणि वेळेवर प्रशिक्षण मिळावे, अशी मागणी अंगणवाडी सेविकांकडून सातत्याने केली जात आहे.
गावागावांतील अंगणवाडी केंद्रांमार्फत प्रधानमंत्री मातृ वंदना योजना, मिशन शक्ती, अंगणवाडी सेवा आणि मिशन वात्सल्य यांसारख्या महत्त्वाच्या योजना राबविल्या जातात. गर्भवती व स्तनदा मातांना आर्थिक मदत, महिला सक्षमीकरण, बालकांना पूरक पोषण आहार तसेच अनाथ व निराधार बालकांच्या संगोपनासाठी या योजनांची महत्त्वपूर्ण भूमिका आहे.
मात्र, या योजनांची ऑनलाइन नोंदणी आणि अहवाल सादर करण्यासाठी अंगणवाडी सेविकांना देण्यात आलेले मोबाईल आणि तांत्रिक साधने कालबाह्य ठरत असल्याचे सांगितले जात आहे. अनेक ठिकाणी इंटरनेटची समस्या, वारंवार बदलणारी ऑनलाइन प्रणाली आणि त्याबाबत वेळेवर प्रशिक्षण न मिळाल्याने माहिती भरताना मोठ्या अडचणी निर्माण होत आहेत.
परिणामी, अनेक लाभार्थ्यांच्या नोंदी आणि कागदपत्रे वेळेत अपलोड होत नसल्याने योजनांचा लाभ मिळण्यास विलंब होत असल्याची खंत व्यक्त केली जात आहे.
अंगणवाडी सेविकांनी शासनाकडे अद्ययावत मोबाईल, सक्षम तांत्रिक सुविधा आणि नियमित प्रशिक्षण उपलब्ध करून देण्याची मागणी केली आहे. त्यामुळे योजनांची प्रभावी अंमलबजावणी होऊन महिला व बालकांना वेळेत लाभ मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.







