नाशिक प्रतिनिधी
इगतपुरी तालुक्यातील भावली धरण व धबधबा परिसरात फिरण्यासाठी गेलेल्या पर्यटकांच्या कुटुंबावर हल्ला करून त्यांच्या वाहनाची तोडफोड केल्याप्रकरणी नाशिक ग्रामीण पोलिसांनी नऊ संशयितांना ताब्यात घेतले असून, एका फरार आरोपीचा शोध सुरू आहे. अटकेत असलेल्या आरोपींपैकी एकावर यापूर्वी हत्येचा गुन्हा दाखल असल्याची माहिती समोर आली आहे.
या कारवाईची माहिती नाशिक ग्रामीणचे पोलीस अधीक्षक डॉ. डी. एस. स्वामी यांनी पत्रकार परिषदेत दिली.
मिळालेल्या माहितीनुसार, रविवारी मुसळधार पावसानंतर भावली धरण परिसरात पर्यटनासाठी मोठी गर्दी झाली होती. यावेळी नाशिकमधील एक कुटुंब फिरण्यासाठी आले असताना काही तरुणांनी महिलांची छेड काढल्याचा आरोप आहे. याचा जाब विचारल्यानंतर संबंधित कुटुंबासोबत धक्काबुक्की करण्यात आली. घाबरलेल्या कुटुंबाने तेथून कारने निघण्याचा प्रयत्न केला; मात्र आरोपींनी सुमारे १० ते १२ किलोमीटरपर्यंत पाठलाग करत त्यांच्या वाहनावर हल्ला करून काचा फोडल्या व मोठी तोडफोड केली.
घटनेनंतर पीडित कुटुंब थेट नाशिक शहरातील अंबड पोलीस ठाण्यात पोहोचले. त्यानंतर हा गुन्हा इगतपुरी पोलीस ठाण्यात वर्ग करण्यात आला. या प्रकरणी हत्येचा प्रयत्न, दरोडा, विनयभंग आदी गंभीर कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी तांत्रिक विश्लेषण, सीसीटीव्ही आणि व्हिडिओ फुटेजच्या आधारे तपास करून आतापर्यंत नऊ संशयितांना ताब्यात घेतले आहे. हे संशयित इगतपुरी तालुक्यातील नांदगाव सदो, बलायदुरी, देवळे, घोटी, माणिकखांब, गिरणारे आदी गावांतील असून ते एकमेकांच्या परिचयातील असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.
पोलीस अधीक्षक डॉ. डी. एस. स्वामी यांनी सांगितले की, तक्रारदारांनी सुरुवातीला सात ते आठ संशयितांविरोधात तक्रार दिली होती. मात्र तपासादरम्यान आरोपींना मदत करणारे, आश्रय देणारे तसेच पळून जाण्यास सहाय्य करणाऱ्यांचाही शोध घेऊन त्यांना गुन्ह्यात समाविष्ट करण्यात आले आहे.
दरम्यान, एका फरार आरोपीचा भिवंडी-वाडा परिसरात शोध सुरू असून, या प्रकरणाचा पुढील तपास नाशिक ग्रामीण पोलीस करत आहेत.


