चिखलदरा | प्रतिनिधी | सारथी महाराष्ट्राचा न्यूज
विदर्भातील मुसळधार पावसामुळे अमरावती जिल्ह्यातील प्रसिद्ध पर्यटनस्थळ चिखलदरा हिरवाईने नटले असून, संपूर्ण परिसर दाट धुके, डोंगररांगा आणि धबधब्यांनी सजला आहे. निसर्गाचे मनमोहक रूप अनुभवण्यासाठी राज्यभरातून मोठ्या संख्येने पर्यटक चिखलदऱ्याकडे आकर्षित होत आहेत.
सध्या चिखलदऱ्यात थंड वातावरण, दाट धुक्याने वेढलेली शिखरे आणि प्रवाही धबधबे पर्यटकांचे विशेष आकर्षण ठरत आहेत. पावसाळी पर्यटनाचा आनंद घेण्यासाठी सुट्टीच्या दिवशी पर्यटकांची मोठी गर्दी होत असून, स्थानिक पर्यटन व्यवसायालाही याचा मोठा फायदा होत आहे.
पर्यटकांची वाढती संख्या लक्षात घेऊन अमरावती जिल्हा प्रशासनाने वाहतूक व्यवस्थेत विशेष बदल केले आहेत. गर्दीच्या दिवसांमध्ये एकमार्गी वाहतूक व्यवस्था लागू करण्यात आली असून, पर्यटकांनी परतवाडा घाट मार्गाने चिखलदऱ्यात प्रवेश करावा आणि घाटंग–सेमाडोह–धारणी मार्गाने बाहेर पडावे, असे निर्देश प्रशासनाने दिले आहेत.
प्रशासनाने पर्यटकांना वाहतूक नियमांचे पालन करण्याचे, सुरक्षिततेची काळजी घेण्याचे आणि पावसाळ्यातील पर्यटनाचा आनंद घेताना आवश्यक खबरदारी बाळगण्याचे आवाहन केले आहे.
