रोटी | प्रतिनिधी
जगद्गुरू संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याच्या वारी मार्गावरील पाटस–बारामती रस्त्यावर सावलीच्या झाडांचा अभाव असल्याने वारकऱ्यांना कडक उन्हाचा मोठा सामना करावा लागत आहे. रस्त्यालगत पूर्वी असलेली अनेक देशी झाडे रस्ते रुंदीकरणाच्या कामात तोडण्यात आल्याने पायी चालणाऱ्या वारकऱ्यांना विश्रांतीसाठी नैसर्गिक सावली उपलब्ध होत नसल्याची खंत व्यक्त केली जात आहे.
उन्हाची तीव्रता वाढल्यामुळे अनेक वारकरी रस्त्यापासून दूर शेतांमधील झाडांच्या सावलीत थांबून विश्रांती घेत आहेत. पाटस–बारामती मार्गावरील चढ-उतार आणि घाटसदृश भागामुळे पायी प्रवास करणाऱ्या वारकऱ्यांचा अधिक शारीरिक श्रम होत आहे.
वारकऱ्यांचे म्हणणे आहे की, दरवर्षी वारीसाठी मोठ्या प्रमाणावर खर्च केला जातो. मात्र, वारी मार्गावरील देशी वृक्षांची लागवड व संवर्धन याकडे अपेक्षित लक्ष दिले जात नाही. पूर्वी या मार्गावर मोठ्या प्रमाणात सावलीची झाडे होती. मात्र रस्ते रुंदीकरणानंतर ती कमी झाल्याने उन्हाचा त्रास अधिक वाढला आहे.
वारी मार्ग अधिक सुरक्षित आणि वारकऱ्यांसाठी सोयीस्कर करण्यासाठी पाटस ते बारामती मार्गावर मोठ्या प्रमाणात देशी वृक्षांची लागवड करून त्यांचे संगोपन करावे, अशी मागणी वारकरी आणि नागरिकांकडून करण्यात येत आहे.
