पंढरपूर | प्रतिनिधी | सारथी महाराष्ट्राचा न्यूज
आषाढी वारीनिमित्त पंढरपुरात दाखल होणाऱ्या लाखो भाविकांना सुरक्षित, स्वच्छ आणि दर्जेदार अन्नपदार्थ उपलब्ध व्हावेत, यासाठी अन्न व औषध प्रशासनाने १४ जुलै रोजी शहरात विशेष तपासणी मोहीम राबवली.
या मोहिमेत एकूण २१७ खाद्य आस्थापनांची तपासणी करण्यात आली. तपासणीदरम्यान १७२ अन्नपदार्थांचे नमुने संकलित करण्यात आले. निकृष्ट दर्जाचे अन्नपदार्थ आणि अस्वच्छता आढळून आल्याने तीन हॉटेल्सवर कारवाई करण्यात आली.
अन्न व औषध प्रशासनाचे सहाय्यक आयुक्त साहेबराव देसाई यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले की, संबंधित हॉटेल्समध्ये अन्न सुरक्षा नियमांचे उल्लंघन झाल्याचे निदर्शनास आल्याने त्यांना वारी कालावधीत हॉटेल्स बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
कारवाई करण्यात आलेली हॉटेल्स :
- स्वरा चायनीज सेंटर (तीन रस्ता)
- मंगलमूर्ती मिसळ
- विष्णुसहस्रनाम हॉटेल (शेगाव दुमाला)
आषाढी वारीदरम्यान भाविकांच्या आरोग्याशी कोणतीही तडजोड होऊ नये, यासाठी तपासणी मोहीम पुढेही सुरू राहणार असल्याचे अन्न व औषध प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
