उदगीर | प्रतिनिधी
साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त आयोजित करण्यात येणाऱ्या जयंती महोत्सव समितीच्या अध्यक्षपदी माजी मंत्री तथा आमदार संजय बनसोडे यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. त्यांच्या निवडीचे विविध स्तरांतून स्वागत होत असून कार्यकर्ते, सामाजिक संघटना तसेच अण्णाभाऊ साठे यांच्या विचारांचे अनुयायी यांनी आनंद व्यक्त केला आहे.
अण्णाभाऊ साठे यांनी आपल्या साहित्य, शाहिरी आणि सामाजिक कार्याच्या माध्यमातून वंचित, शोषित व कष्टकरी समाजाला आवाज दिला. त्यांच्या विचारांचा वारसा जपत तो नव्या पिढीपर्यंत पोहोचविण्याच्या उद्देशाने दरवर्षी जयंती महोत्सवाचे आयोजन करण्यात येते. यंदाचा महोत्सव अधिक व्यापक, भव्य आणि उत्साहपूर्ण पद्धतीने साजरा करण्यासाठी समितीने आ. संजय बनसोडे यांच्या नेतृत्वावर विश्वास व्यक्त केला आहे.
समितीच्या बैठकीत जयंतीनिमित्त विविध उपक्रमांचे नियोजन करण्यात आले. अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेला अभिवादन, भव्य मिरवणूक, सांस्कृतिक कार्यक्रम, समाजप्रबोधनपर व्याख्याने, गुणवंत विद्यार्थी व समाजातील विविध क्षेत्रांतील मान्यवरांचा सत्कार तसेच सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्याबाबत चर्चा झाली.
यावेळी उपस्थित मान्यवरांनी अण्णाभाऊ साठे यांच्या विचारांचा प्रसार करण्यासाठी जयंती महोत्सव समाजातील सर्व घटकांच्या सहभागातून उत्साहात साजरा करण्याचे आवाहन केले. तसेच हा महोत्सव सामाजिक ऐक्य, समता आणि प्रबोधनाचा संदेश देणारा ठरेल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला.
— सारथी महाराष्ट्राचा न्यूज
