पाटण | प्रतिनिधी
कडवे खुर्द (केळेवाडी खालची) येथील गटारे व नाल्यांची वेळेत साफसफाई न झाल्याने पावसाचे पाणी थेट शेतांमध्ये साचून अनेक शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे.
ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार, गटार सफाईबाबत अनेक वेळा ग्रामपंचायतीकडे तक्रारी व लेखी निवेदने देण्यात आली. मात्र, आजपर्यंत कोणतीही ठोस कार्यवाही करण्यात आली नसल्याने पावसाचे पाणी शेतांमध्ये साचले असून शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत.
शेतकऱ्यांनी तातडीने गटारे व नाल्यांची साफसफाई करून पाण्याचा निचरा करण्याची तसेच नुकसानग्रस्त पिकांचे पंचनामे करून योग्य नुकसानभरपाई देण्याची मागणी केली आहे.
मागण्यांकडे दुर्लक्ष झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही ग्रामस्थांनी प्रशासनाला दिला आहे.
— प्रतिनिधी, सारथी महाराष्ट्राचा न्यूज
