
कोंढाळी | प्रतिनिधी
कोंढाळी नगरपंचायत हद्दीतील प्रभाग क्रमांक १५ व १६ मध्ये वन विभागाच्या जागेवर अनेक वर्षांपासून वास्तव्यास असलेल्या पात्र कुटुंबांना वनहक्क कायदा २००६ अंतर्गत मालकी हक्काचे पट्टे मंजूर करण्यात यावेत, अशी मागणी शिवसेना ओबीसी विभागाच्या वतीने करण्यात आली आहे.
यासंदर्भात कोंढाळी नगरपंचायत, काटोल तहसीलदार तसेच वन विभागाच्या संबंधित अधिकाऱ्यांना निवेदन सादर करण्यात आले. हे निवेदन शिवसेना ओबीसी विभाग कोंढाळी शहर प्रमुख सचिन भारसकरे यांच्या शीर्षकपत्रावर नागपूर जिल्हा समन्वयक अमोल तांदुळकर यांच्या नेतृत्वाखाली देण्यात आले.
निवेदनात म्हटले आहे की, प्रभाग क्रमांक १५ व १६ मधील अनेक कुटुंबे गेल्या अनेक वर्षांपासून वनजमिनीवर घरे बांधून राहत आहेत. मात्र, अनुसूचित जमाती व इतर पारंपरिक वननिवासी (वनहक्कांची मान्यता) अधिनियम, २००६ अंतर्गत पात्र असूनही अनेक नागरिकांना अद्याप मालकी हक्काचे पट्टे मंजूर झालेले नाहीत.
पट्टे मंजूर नसल्यामुळे नागरिकांना प्रधानमंत्री आवास योजना, घरकुल योजना, वीज, पाणी, बँक कर्ज तसेच विविध शासकीय योजनांचा लाभ घेण्यात अडचणी येत असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
त्यामुळे संबंधित विभागाने तातडीने प्रत्यक्ष पाहणी करून पात्र नागरिकांचे वनहक्क दावे निकाली काढावेत व वनहक्क कायदा २००६ नुसार मालकी हक्काचे पट्टे मंजूर करावेत, अशी मागणी करण्यात आली.
यावेळी शिवसेना काटोल तालुका सहसंघटक संदीप कळसे उपस्थित होते.
— प्रतिनिधी, सारथी महाराष्ट्राचा न्यूज
