जामखेड | प्रतिनिधी :
जामखेड तालुक्यात गेल्या आठवडाभरापासून पावसाने दडी मारल्याने खरीप हंगाम संकटात सापडला आहे. सुरुवातीच्या पावसावर विश्वास ठेवून पेरणी केलेल्या सोयाबीन, कापूस, तूरसह अन्य खरीप पिकांना ओलाव्याअभावी फटका बसत असून अनेक ठिकाणी पिके करपू लागली आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांसमोर दुबार पेरणीचे संकट उभे राहिले आहे.
तालुक्यातील बहुतांश शेतकऱ्यांनी कर्ज काढून महागडे बियाणे व खते खरेदी करत पेरणी पूर्ण केली होती. सुरुवातीच्या पावसामुळे पिकांची उगवणही समाधानकारक झाली होती. मात्र, त्यानंतर पावसाने पाठ फिरवल्याने जमिनीतील ओलावा झपाट्याने कमी झाला असून उगवलेली पिके सुकण्याच्या मार्गावर आहेत. बदलत्या हवामानामुळे यंदाचा खरीप हंगाम धोक्यात येण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
पावसाअभावी तालुक्यातील नदी-नाले आणि ओढे कोरडे पडू लागले असून अनेक विहिरींची पाणीपातळीही खालावू लागली आहे. त्यामुळे शेतीबरोबरच पिण्याच्या पाण्याचाही प्रश्न गंभीर होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. जनावरांसाठी हिरव्या चाऱ्याची टंचाई निर्माण होण्याची भीतीही व्यक्त केली जात आहे.
पाऊस आणखी काही दिवस लांबल्यास उत्पादनात मोठी घट होण्याची शक्यता असून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना शासनाने तातडीने मदत करावी, अशी मागणी शेतकरी वर्गातून होत आहे.
— प्रतिनिधी, सारथी महाराष्ट्राचा न्यूज
