
📰 सारथी महाराष्ट्राचा न्यूज | वेरूळ, छत्रपती संभाजीनगर | प्रतिनिधी
युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळाचा दर्जा लाभलेल्या एलोरा लेणी परिसरात अस्वच्छतेचे गंभीर चित्र समोर आले आहे. लेणीसमोरील वाहनतळ परिसर तसेच स्थानिक व्यावसायिकांच्या दुकानांजवळ मोठ्या प्रमाणात प्लास्टिक, पाण्याच्या बाटल्या, खाद्यपदार्थांचे अवशेष आणि इतर कचरा साचलेला दिसून येत आहे. त्यामुळे देश-विदेशातून येणाऱ्या पर्यटकांसमोर महाराष्ट्राच्या पर्यटन व्यवस्थेची प्रतिमा मलिन होत असल्याची भावना व्यक्त केली जात आहे.
शासनाकडून एलोरा परिसरात पर्यटन आणि पायाभूत सुविधा विकसित करण्यासाठी विविध योजना राबविल्या जात असल्याचे सांगितले जात असले, तरी प्रत्यक्षात स्वच्छता आणि कचरा व्यवस्थापनाकडे पुरेसे लक्ष दिले जात नसल्याचे दिसून येत आहे. याशिवाय अतिक्रमण, अनियंत्रित विक्रेते आणि परिसर व्यवस्थापनाचे प्रश्नही कायम असल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे.
या पार्श्वभूमीवर अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. जागतिक वारसा स्थळाच्या परिसरातील स्वच्छतेची जबाबदारी नेमकी कोणाची? स्थानिक प्रशासन, भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण (ASI) की पर्यटन विभाग? परिसरात कचरा टाकणाऱ्या पर्यटक आणि व्यावसायिकांवर कारवाई का होत नाही? तसेच लाखो पर्यटक भेट देणाऱ्या या ठिकाणी कायमस्वरूपी कचरा व्यवस्थापन व्यवस्था का उभारली जात नाही, असा सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.
पर्यटकांसाठी स्वच्छ, सुरक्षित आणि आकर्षक वातावरण निर्माण करणे ही प्रशासनाबरोबरच स्थानिक नागरिक आणि व्यावसायिकांचीही सामूहिक जबाबदारी आहे. मात्र, जागतिक वारसा स्थळाच्या प्रवेशद्वारावरच कचऱ्याचे ढीग दिसत असल्याने या प्रश्नाकडे तातडीने लक्ष देण्याची गरज व्यक्त केली जात आहे.
स्थानिक नागरिकांनी संबंधित विभागांनी त्वरित स्वच्छता मोहीम राबवून प्रभावी कचरा व्यवस्थापन प्रणाली उभारावी, तसेच परिसराची नियमित स्वच्छता आणि देखरेख सुनिश्चित करावी, अशी मागणी केली आहे.

