📰 सारथी महाराष्ट्राचा न्यूज | महाराष्ट्र | प्रतिनिधी
राज्यातील मुदत संपलेल्या ग्रामपंचायतींच्या निवडणुका ऑगस्ट महिन्यात होण्याची शक्यता असून, राज्य निवडणूक आयोगाने विधानसभा मतदार यादीच्या आधारे ग्रामपंचायत निवडणुका घेण्याचा निर्णय जाहीर केला आहे. त्यानुसार मतदार यादी तयार करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.
निवडणूक आयोगाच्या नियोजनानुसार 24 जुलै रोजी प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध करण्यात येणार आहे. त्यानंतर 24 ते 29 जुलै या कालावधीत मतदार यादी तयार करण्याचे काम होईल. 29 जुलै ते 3 ऑगस्ट दरम्यान प्राप्त हरकती व दावे निकाली काढून आवश्यक दुरुस्त्या करण्यात येतील. त्यानंतर 4 ऑगस्ट रोजी अंतिम मतदार यादी प्रसिद्ध केली जाणार आहे.
अंतिम मतदार यादी जाहीर झाल्यानंतर ऑगस्टच्या दुसऱ्या किंवा तिसऱ्या आठवड्यात ग्रामपंचायत निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. उमेदवारी अर्ज, छाननी, माघार आदी प्रक्रियेसाठी सुमारे आठ दिवसांचा कालावधी दिला जाऊ शकतो.
यापूर्वी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांप्रमाणेच ग्रामपंचायत निवडणुकांचाही कार्यक्रम अल्पावधीत पार पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे सप्टेंबरपर्यंत मुदत संपलेल्या ग्रामपंचायतींना नवीन सरपंच आणि सदस्य मिळण्याची शक्यता निर्माण झाली असून, इच्छुक उमेदवार आणि राजकीय पक्षांनी निवडणुकीच्या तयारीला वेग दिला आहे.

