
📰 सारथी महाराष्ट्राचा न्यूज | जानेफळ | प्रतिनिधी
लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या स्मृतिदिनानिमित्त जानेफळ येथे त्यांना भावपूर्ण व विनम्र अभिवादन करण्यात आले. “पृथ्वी शेषाच्या मस्तकावर नाही, तर कष्टकरी जनतेच्या तळहातावर तरलेली आहे,” हा त्यांचा अजरामर विचार स्मरण करत उपस्थितांनी त्यांच्या कार्याला आदरांजली वाहिली.
यावेळी अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला. त्यांच्या साहित्य, शाहिरी आणि समाजप्रबोधनाच्या कार्याचा गौरव करत सामाजिक समता, बंधुता, न्याय आणि कष्टकरी जनतेच्या हक्कांसाठी त्यांनी दिलेल्या योगदानाचे स्मरण करण्यात आले.
उपस्थित मान्यवरांनी अण्णाभाऊ साठे यांच्या विचारांचा वारसा जपत वंचित, शोषित आणि दुर्बल घटकांच्या उन्नतीसाठी कार्य करण्याचा संकल्प व्यक्त केला. त्यांच्या साहित्याने अन्यायाविरुद्ध लढण्याची प्रेरणा दिली असून, आजच्या काळातही त्यांच्या विचारांची तितकीच आवश्यकता असल्याचे मत व्यक्त करण्यात आले.
यावेळी “महान व्यक्ती शरीराने दूर जातात, पण त्यांचे विचार समाजाला कायम दिशा देत राहतात,” या भावना व्यक्त करत लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे जीवनकार्य संघर्ष, स्वाभिमान आणि सामाजिक परिवर्तनाचे प्रेरणास्थान असल्याचे उपस्थितांनी नमूद केले.
