
कळंबोली | प्रतिनिधी :
साखरेच्या वाढत्या दरामुळे सर्वसामान्य नागरिकांच्या घरगुती अर्थसंकल्पावर अतिरिक्त आर्थिक भार पडत असल्याचा आरोप करत महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे) पनवेल महानगर महिला आघाडीच्या वतीने गुरुवार, दि. २७ ऑगस्ट रोजी पनवेल तहसीलदार कार्यालयावर धडक मोर्चा काढण्यात आला. साखरेच्या दरवाढीवर तातडीने नियंत्रण आणून सर्वसामान्य नागरिकांना दिलासा द्यावा, अशी मागणी यावेळी करण्यात आली.
पनवेल मनसे महानगराध्यक्ष योगेश चिले यांच्या मार्गदर्शनाखाली आणि पनवेल मनसे महानगर महिला आघाडीच्या अध्यक्षा स्वरूपाताई सुर्वे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले. वाढत्या साखरेच्या दरामुळे नागरिकांच्या दैनंदिन खर्चावर परिणाम होत असून, शासनाने या प्रश्नाकडे गांभीर्याने लक्ष देऊन तातडीने उपाययोजना कराव्यात, अशी भूमिका आंदोलनकर्त्यांनी मांडली.
यावेळी बोलताना स्वरूपाताई सुर्वे यांनी सर्वसामान्य नागरिकांच्या प्रश्नांसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेना सातत्याने आवाज उठवत राहील, असे सांगितले. जनतेच्या हक्कांसाठी मनसेचा संघर्ष सुरूच राहणार असल्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला.
या आंदोलनाला पनवेल महानगर सचिव पराग बालाड, वाहतूक सेनेचे जिल्हाध्यक्ष सचिन जाधव, संजय मुरकुटे, पनवेल उपशहर अध्यक्षा साक्षी दळवी, नवीन पनवेल उपशहर अध्यक्षा पूजा मोहन, नवीन पनवेल सचिव मनीषा देशमुख, स्नेहल बागल, गौरी खताळ, मानसी सकपाळ, कामोठे सचिव क्रांती सारंग, कामोठे विभाग अध्यक्षा दीपाली काळे, पनवेल उपशहर अध्यक्ष रोहन पाटील, कळंबोली उपशहर अध्यक्ष राहुल चव्हाण, कामोठे उपशहर अध्यक्ष मनोज कोठारी आणि विद्यार्थी सेनेचे जिल्हाध्यक्ष अमर पाटील यांच्यासह मनसेचे महिला व पुरुष पदाधिकारी, कार्यकर्ते आणि महाराष्ट्र सैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
साखरेच्या दरवाढीचा प्रश्न तातडीने मार्गी लावून सर्वसामान्य नागरिकांना दिलासा मिळावा, यासाठी मनसेच्या वतीने यापुढेही आंदोलनात्मक भूमिका कायम ठेवण्यात येईल, असा इशारा यावेळी देण्यात आला.
