यवतमाळ जिल्ह्याच्या शेवटच्या टोकावर आणि चंद्रपूर जिल्ह्याच्या सीमेलगत असलेल्या कवडशीच्या जंगलात प्राचीन किल्ला, गुंफा आणि मंदिरे असा ऐतिहासिक वारसा दडलेला आहे. घनदाट जंगल, डोंगररांगा आणि निर्गुडा नदीचा परिसर यामुळे हे ठिकाण निसर्ग सौंदर्यानेही समृद्ध आहे. मात्र, दुर्लक्षामुळे हा प्राचीन ठेवा आजही पर्यटनाच्या नकाशावर उपेक्षितच आहे.
वणी तालुक्याच्या शेवटच्या टोकावर पुनवट वरून दक्षिण दिशेला कवडशी हे गाव आहे. गावाजवळून वाहणाऱ्या निर्गुडा नदीच्या परिसरात मोठमोठे दगडी पहाड आणि घनदाट जंगल आहे. या भागात फिरताना पाषाणयुगीन शस्त्रे आढळून येत असल्याचे स्थानिकांकडून सांगितले जाते. त्यामुळे प्राचीन काळापासून या परिसरात मानवी वावर असावा, असा अंदाज व्यक्त केला जातो.
दगडी पहाडांनी व्यापलेल्या या जंगलात एका डोंगरावर प्राचीन किल्ल्याचे अवशेष आहेत, तर दुसऱ्या डोंगरात मानवनिर्मित गुंफा आहे. याच परिसरातील एका पहाडावर मल्हारगड दत्त देवस्थान आहे.दर वर्षी दत्त जयंती ला मोठी यात्रा असतात.
गोंड राजवटीच्या खुणा?
स्थानिकांच्या माहितीनुसार, या किल्ल्याची निर्मिती गोंड राजांच्या काळात झाली असावी. काही वर्षांपूर्वी शिरपूर येथे गोंड राजाचे राज्य होते आणि तेथे मातीचा किल्ला बांधण्यात आला होता. कवडशीच्या जंगलातील किल्ला ही त्याच काळातील असावा, असा स्थानिकांचा अंदाज आहे. मात्र, या किल्ल्याचा नेमका इतिहास स्पष्ट करण्यासाठी पुरातत्त्वीय सर्वेक्षण आणि अभ्यासाची गरज आहे.
किल्ल्यालगतच्या एका डोंगरात आदिवासी बांधवांचे श्रद्धास्थान आहे. येथील देवतेला ग्रामस्थ ‘भानाबाई’ या नावाने ओळखतात.
प्राचीन गुंफा आणि दत्त मंदिर
किल्ल्यापासून दक्षिण दिशेला एका डोंगरात मानवनिर्मित प्राचीन गुंफा असल्याचे सांगितले जाते. दुसऱ्या डोंगरावर शेकडो वर्षे जुने दत्तात्रेय मंदिर आहे. परिसरात शंकर, गणेश तसेच विविध देवी-देवतांच्या दगडी मूर्तीही आढळतात.
या ठिकाणी पूर्वी ऋषी-मुनी तपश्चर्या करीत असावेत, अशी स्थानिकांची श्रद्धा आहे. डोंगरात तपश्चर्येसाठी वापरल्या जात असाव्यात अशा काही खोल्याही आहेत. आजही काही साधू-संत येथे ध्यानधारणा करण्यासाठी येतात. सध्या परिसरात जगन्नाथ महाराजांचा मठ असून अनेक छोटी मंदिरे ही आहेत.
मंदिराच्या पायथ्याशी वन्यप्राण्यांची तहान भागविण्यासाठी तलाव खोदण्यात आलेला आहे. त्यामुळे धार्मिक आणि ऐतिहासिक वारशा सोबतच हा परिसर वन्यजीव आणि निसर्गाच्या दृष्टीनेही महत्त्वाचा ठरतो.
पर्यटनाची मोठी क्षमता
कवडशीचा हा परिसर निसर्ग आणि प्राचीन वारसा यांचा अनोखा संगम आहे. निर्गुडा नदी, घनदाट जंगल, दगडी डोंगर, प्राचीन किल्ल्याचे अवशेष, मानवनिर्मित गुंफा, मंदिरे आणि दगडी मूर्ती यामुळे या भागात पर्यटनाची मोठी क्षमता आहे.
विशेष म्हणजे वणी-घुग्गुस मार्गाच्या जवळ असल्याने येथे पोहोचणे तुलनेने सोयीचे आहे. आवश्यक पायाभूत सुविधा, मार्गदर्शक व्यवस्था आणि सुरक्षिततेच्या उपाययोजना विकसित केल्यास हे ठिकाण वणी तालुक्यासह संपूर्ण विदर्भातील पर्यटकांसाठी आकर्षणाचे केंद्र बनू शकते.
प्राचीन वारशाच्या संवर्धनाची गरज
इतिहासाच्या अनेक खुणा जपणारा हा परिसर मात्र अद्याप दुर्लक्षित आहे. योग्य सर्वेक्षणाअभावी या किल्ल्याचा, गुंफेचा आणि मंदिर परिसराचा नेमका इतिहासही अद्याप स्पष्ट झालेला नाही. काळाच्या ओघात नैसर्गिक झीज, मानवी हस्तक्षेप आणि दुर्लक्षामुळे हा वारसा नष्ट होण्याची शक्यता आहे.
त्यामुळे शासन आणि प्रशासनाने या परिसराचे पुरातत्त्वीय व ऐतिहासिक सर्वेक्षण करून प्राचीन वास्तूंचे संवर्धन करणे गरजेचे आहे. पर्यटनाच्या दृष्टीने नियोजनबद्ध विकास झाल्यास कवडशीच्या जंगलातील हा दुर्लक्षित ठेवा विदर्भाच्या पर्यटन नकाशावर महत्त्वाचे स्थान मिळवू शकतो.
निसर्गाच्या कुशीत दडलेला इतिहास शोधण्याची आणि तो पुढील पिढ्यांसाठी जतन करण्याची हीच योग्य वेळ आहे.











