
महागोंड येथील आप्पासाहेब गायकवाड हायस्कूलमध्ये इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ भावनिक आणि उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून माजी मुख्याध्यापक रविकांत सुतार सर तसेच आणासाहेब दिवटे सर उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने करण्यात आली. प्रमुख पाहुणे रविकांत सुतार यांनी विद्यार्थ्यांना यशाची “चतुरसूत्री” सांगितली. कठोर परिश्रम, सातत्य, आत्मविश्वास आणि स्पष्ट ध्येय ही यशाची चार महत्त्वाची सूत्रे असल्याचे त्यांनी सांगितले. विद्यार्थ्यांनी सकारात्मक दृष्टिकोन ठेवून परीक्षेला सामोरे जावे, असे आवाहन त्यांनी केले.
आणासाहेब दिवटे यांनी विद्यार्थ्यांच्या भावना व्यक्त करताना सांगितले की, “विद्यार्थ्यांनी आपल्या मनोगतात शाळेचे नाव उज्ज्वल ठेवण्याचा निर्धार व्यक्त केला आहे. शाळेला कोणताही तडा जाऊ नये असे आपण वागणार आहोत, ही त्यांची भावना अभिमानास्पद आहे.” तसेच त्यांनी भावनिक होत सांगितले की, “मी आजपर्यंत जे शिकवले त्याचे समाधान मला या विद्यार्थ्यांकडून मिळाले.”

प्रशालेचे मुख्याध्यापक श्री. दीपक कांबळे सर यांनी विद्यार्थ्यांना आगामी बोर्ड परीक्षेसाठी मार्गदर्शन करताना दहावीनंतर उपलब्ध असलेल्या विविध करिअर संधींची माहिती दिली. आपल्या आवडीनुसार व क्षमतेनुसार योग्य क्षेत्र निवडण्याचा सल्ला त्यांनी दिला.
यावेळी दहावीच्या विद्यार्थ्यांनी शाळेविषयीच्या आपल्या आठवणी व अनुभव कथन करत शिक्षकांप्रती कृतज्ञता व्यक्त केली. कार्यक्रमाला शिक्षक प्रताप देसाई, रविंद्र भोसले, राजाराम लोखंडे, संजीवनी खराडे तसेच शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रम आनंद, प्रेरणा आणि भावनिक वातावरणात संपन्न झाला.








