वनविभाग व स्थानिक शाळांच्या संयुक्त विद्यमाने वणव्याचे दुष्परिणाम आणि उपाययोजनांबाबत प्रबोधन.

राकेश शेरकी | तालुका प्रतिनिधी
चिमूर (प्रतिनिधी):
उन्हाळ्याची चाहूल लागताच जंगलांना लागणाऱ्या वणव्यांचे प्रमाण वाढते. या पार्श्वभूमीवर, वन संपत्तीचे रक्षण करण्यासाठी आणि वणव्याबाबत ग्रामस्थांमध्ये जागृती निर्माण करण्यासाठी आज मदनापूर येथे भव्य ‘वन वणवा जनजागृती रॅली’ काढण्यात आली. वनपरिक्षेत्र पळसगाव अंतर्गत येणाऱ्या वनविभागाचे क्षेत्र सहाय्यक मा. अमोलजी कवासे यांच्या मार्गदर्शनात हा उपक्रम राबविण्यात आला.
सदर रॅलीमध्ये जय लहरी जय मानव विद्यालय, मदनापूर आणि जि.प. उच्च प्राथमिक शाळा, मदनापूर येथील विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला. रॅली दरम्यान विद्यार्थ्यांनी वणवा प्रतिबंधक घोषवाक्ये (स्लोगन) आणि जनजागृतीपर गीते गाऊन संपूर्ण मदनापूर गाव दणाणून सोडले. जंगलाला वणवा लावू नका, वन्यजीवांचे रक्षण करा, अशा घोषणा देत रॅलीने ग्रामस्थांचे लक्ष वेधून घेतले.
रॅलीचा समारोपीय कार्यक्रम जय लहरी जय मानव विद्यालयाच्या प्रांगणात पार पडला. या कार्यक्रमाचे अध्यक्षपद मा. अमोलजी कवासे यांनी भूषवले. प्रमुख पाहुणे म्हणून श्री. दांडेकर सर, बावनकर सर, वनरक्षक दाते साहेब, जि.प. शाळेचे मुख्याध्यापक बनसोड सर, धुर्वे सर, दोडके मॅडम, वनरक्षक जरारे साहेब आणि वनरक्षक नागलोत साहेब उपस्थित होते. कार्यक्रमाचे उत्कृष्ट संचालन मा. कुशाब रोकडे सर यांनी केले.
प्रसंगी उपस्थितांना मार्गदर्शन करताना मा. दांडेकर सर, मुख्याध्यापक बनसोड सर, कवासे साहेब आणि निसर्ग पर्यटन मार्गदर्शक राकेश शेरकी यांनी वणव्याचे भीषण दुष्परिणाम विशद केले. वणव्यामुळे केवळ झाडेच जळत नाहीत, तर संपूर्ण जैवविविधता, लहान वन्यजीव आणि सरपटणारे प्राणी नष्ट होतात, असे त्यांनी सांगितले. तसेच वणवा लागू नये म्हणून घ्यायची खबरदारी आणि तो लागल्यास करावयाच्या उपाययोजनांबाबत सविस्तर माहिती दिली.
या कार्यक्रमाला दोन्ही शाळांचे विद्यार्थी, सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी, वनविभागाचे कर्मचारी, पर्यटन मार्गदर्शक, जिप्सी चालक-मालक आणि पी.आर.टी. चमू मोठ्या संख्येने उपस्थित होती. कार्यक्रमाचा समारोप मा. बावनकर सर यांनी मानलेल्या आभार प्रदर्शनाने झाला.









