

४०५ विद्यार्थ्यांच्या सहभागातून घुमला ‘शिव विचारांचा’ जागर
मुक्ताईनगर (प्रतिनिधी-सागर नानोटे)
येथील योगमाया प्रतिष्ठान या नोंदणीकृत सामाजिक संस्थेच्या वतीने युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्त शहरात भव्य निबंध लेखन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. “लेखन संस्कृती जपत शिव विचारांचा जागर” या संकल्पनेतून पार पडलेल्या या स्पर्धेत मुक्ताईनगरमधील ४०५ विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला.
छत्रपती शिवाजी महाराजांचे लोककल्याणकारी नेतृत्व, त्यांचा संघर्ष आणि स्वराज्याची निर्मिती या पैलूंचा विद्यार्थ्यांनी सखोल अभ्यास व चिंतन करावे, या उद्देशाने ही स्पर्धा घेण्यात आली. मुक्ताईनगर मधील एकूण सहा केंद्रांवर ही स्पर्धा पार पडली. प्रत्येक केंद्रावर महाराजांच्या प्रतिमेचे पूजन व अभिवादन करून स्पर्धेला उत्साहात सुरुवात करण्यात आली.
गटनिहाय विषय आणि विद्यार्थ्यांचा प्रतिसाद
ही स्पर्धा तीन गटांत विभागण्यात आली होती:
- प्रथम गट (इयत्ता ५ वी ते ८ वी): या गटात सर्वाधिक ३२१ विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. ‘शिवराय माझे आवडते राजे’, ‘शिवरायांचे बालपण व जिजाऊंचे संस्कार’ आणि ‘गड-किल्ले संवर्धन’ अशा विषयांवर विद्यार्थ्यांनी आपले विचार मांडले.
- द्वितीय गट (इयत्ता ९ वी ते १२ वी): या गटातील ६३ विद्यार्थ्यांनी ‘आजच्या काळातील शिवविचारांची गरज’ आणि ‘भारतीय नौदलाचे जनक’ यांसारख्या विषयांवर लेखन केले.
- तृतीय गट (वरिष्ठ महाविद्यालय): महाविद्यालयीन २९ विद्यार्थ्यांनी ‘स्वराज्य ते सुराज्य’ आणि ‘शिवरायांचे लष्करी व्यवस्थापन’ यांसारख्या गंभीर विषयांवर आपले कसब पणाला लावले.
यांचे लाभले सहकार्य
ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी योगमाया प्रतिष्ठानचे अध्यक्ष श्री. अश्विन सुरवाडे यांच्या मार्गदर्शनाखाली संकेत कपले, मयूर पाटील, सनत जैन, प्रवीण राठोड, मनीष महाजन, तेजस सापधरे, वैभव इंगळे, रूपेश कोळी, विश्वजित देशमुख आणि अनिल गवते यांनी विशेष परिश्रम घेतले.
या उपक्रमामुळे शहरात शैक्षणिक आणि वैचारिक वातावरण निर्माण झाले असून, विद्यार्थी वर्गातून प्रतिष्ठानच्या या उपक्रमाचे कौतुक होत आहे.





