अभूतपूर्व प्रतिसादात रंगला अरण्य सोहळ
चौकट –
पालकांची उत्स्फूर्त प्रतिक्रिया
‘अरण्य’ थीमवर आधारित स्नेहसंमेलनाचा कार्यक्रम पाहून पालकांनी समाधान व्यक्त केले.
ग्रामीण भागात इतक्या सुंदर सुविधा आणि दर्जेदार सादरीकरण पाहून अभिमान वाटतो. मुलांमध्ये केवळ शैक्षणिक प्रगतीच नव्हे, तर संस्कार, सामाजिक जाणीव आणि पर्यावरणाविषयी प्रेमही जोपासले जात आहे, हे या कार्यक्रमातून स्पष्ट दिसून आले, असे पालकांनी सांगितले.
उंदीरवाडी प्रतिनिधी मनिष जाधव – आजच्या पिढीला पर्यावरण आणि वनसंवर्धनाची जाणीव करून देणे ही काळाची गरज आहे. सावित्रीबाई फुले इंग्लिश मिडीयम स्कूल उंदीरवाडी ता येवला च्या विद्यार्थ्यांनी ‘अरण्य’ ही संकल्पना निवडून जंगलाचे महत्त्व, वन्यजीवांचे संरक्षण आणि पर्यावरण संतुलन याबाबत अत्यंत प्रभावी संदेश दिला आहे. लहान वयातच निसर्गाबद्दल प्रेम आणि जबाबदारीची भावना निर्माण झाली, तर भविष्यात पर्यावरण रक्षणाची चळवळ अधिक बळकट होणार असल्याचे प्रतिपादन वन विभागाचे अधिकारी राहुल घुगे यांनी केले.
येवला तालुक्यातील उंदीरवाडी येथील सवित्रीबाई फुले इंग्लिश मीडियम स्कूलच्या वार्षिक स्नेहसंमेलनाचा सोहळा स्कूलचे संस्थापक अध्यक्ष सचिनभाऊ कळमकर यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आला होता याप्रसंगी वन विभागाचे अधिकारी राहुल घुगे बोलत होते.
यावेळी वन विभागाचे अधिकारी राहुल घुगे, शिक्षणाधिकारी संजय कुसाळकर, विश्वात्मक जंगली महाराज आश्रम ट्रस्ट चे सरचिटणीस हनुमंतराव भोंगळे,
नामदार छगनरावजी भुजबळ साहेब यांचे स्वीय्य सहाय्यक बाळासाहेब लोखंडे, संस्थेचे अध्यक्ष सचिनभाऊ कळमकर, उपाध्यक्ष विशाल कळमकर, सचिव अचित कळमकर, प्रसिद्ध गायिका गायत्री साळवे तसेच झी टॉकीज फ्रेम हास्य कलाकार संदीप जाधव यांच्यासह आदि मान्यवर उपस्थित होते.
स्कूलचे प्राचार्या वंदना थोरात यांनी प्रास्ताविक करताना म्हणाले की, संस्थेचे संस्थापक अध्यक्ष
सचिनभाऊ कळमकर व उपाध्यक्ष विशाल कळमकर यांच्या दूरदृष्टीमुळेच स्कूल शैक्षणिक तसेच सांस्कृतिक क्षेत्रात सातत्याने प्रगती करत आहे.
विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी विविध उपक्रम राबविले जात असून, शिक्षणासोबत संस्कार व सामाजिक जाणीव यांनाही तितकेच महत्त्व दिले जातात. स्नेहसंमेलनासाठी ‘अरण्य’ ही थीम ही पर्यावरण संवर्धनाचा संदेश देणे ही काळाची गरज असून विद्यार्थ्यांनी नृत्य, नाटिका व गीतांच्या माध्यमातून जंगल आणि वन्यजीव संरक्षणाचा प्रभावी संदेश समाजापर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न या माध्यमातून केले असल्याचे प्राचार्या वंदना थोरात यांनी सांगितले. उपस्थित सर्व मान्यवरांचे सत्कार संस्थेचे संस्थापक अध्यक्ष सचिन कळमकर यांच्या हस्ते करण्यात आला.
संस्थेचे संस्थापक अध्यक्ष सचिन कळमकर बोलताना म्हणाले की, रंगमंचावर उभे राहून आपल्या विद्यार्थ्यांनी केवळ कला सादर केली नाही, तर विचार मांडला, संदेश दिला आणि समाजाप्रती आपली जबाबदारीही दाखवून दिली. ‘अरण्य’ या थीममधून त्यांनी पर्यावरण संवर्धनाचा अत्यंत हृदयस्पर्शी संदेश दिला आहे. हीच आमच्या शिक्षणपद्धतीची खरी ओळख आहे. क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या कार्याचा आदर्श घेत, ग्रामीण भागातील प्रत्येक विद्यार्थ्याला गुणवत्तापूर्ण आणि संस्कारयुक्त शिक्षण मिळावे, हा संस्थेचा ध्यास असुन विद्यार्थ्यांच्या डोळ्यातील आत्मविश्वास आणि पालकांच्या चेहऱ्यावरील समाधान हेच आमचे यश असल्याचे सचिन कळमकर यांनी सांगितले.
कार्यक्रमांचे प्रमुख पाहुणे वन विभागाचे अधिकारी राहुल घुगे यावेळी बोलताना म्हणाले की, जंगल हे केवळ झाडांचे समूह नसून पृथ्वीचे फुफ्फुस आहे. पाणी, हवा आणि जैवविविधता यांचे संतुलन राखण्यात वनांचे मोलाचे योगदान आहे. विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या नृत्य, नाटिका आणि संदेशातून ‘जंगल वाचवा, पृथ्वी वाचवा’ हा विचार प्रभावीपणे मांडला. हा उपक्रम केवळ सांस्कृतिक कार्यक्रम नसून सामाजिक जागृतीची चळवळ आहे.
शाळेच्या व्यवस्थापनाचे कौतुक करताना श्री. घुगे म्हणाले की, सावित्रीबाई फुले इंग्लिश मिडीयम स्कूल
शिक्षणासोबतच सामाजिक भान देणारे उपक्रम राबविणे हीच खरी शिक्षणाची दिशा आहे. अशा कार्यक्रमांमुळे विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास वाढतोच, शिवाय समाजाप्रती जबाबदारीची जाणीवही दृढ होते. सर्व विद्यार्थ्यांनी वृक्षलागवड, पाणी संवर्धन आणि पर्यावरण रक्षणासाठी पुढाकार घ्यावा असे आवाहन केले व भविष्यातही वन विभागाच्या वतीने अशा उपक्रमांना सहकार्य करण्याचे आश्वासन वन विभागाचे अधिकारी राहुल घुगे यांनी दिले.
विश्वात्मक जंगली महाराज आश्रम ट्रस्ट चे सरचिटणीस हनुमंतराव भोंगळे यावेळी बोलताना म्हणाले की, खेडी गावासारख्या ग्रामीण भागात विद्यार्थ्यांसाठी सुंदर सुविधा असलेली शाळा उभी करणे ही मोठी सामाजिक सेवा आहे. केवळ आधुनिक शिक्षणच नव्हे तर मुलांना चांगले संस्कार देण्याचे कार्यही संस्था प्रभावीपणे करत आहे. शिक्षणासोबत मूल्यांची जपणूक होत असेल, तरच समाजाचा पाया भक्कम राहतो.
संस्थेचे अध्यक्ष सचिनभाऊ कळमकर व कळमकर परिवार यांच्या दूरदृष्टीमुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शहरांप्रमाणे दर्जेदार, आधुनिक आणि संस्कारक्षम शिक्षणाची सुवर्णसंधी उपलब्ध झाली आहे. खेड्यातूनही गुणवत्तापूर्ण शिक्षण घेऊन विद्यार्थी मोठी स्वप्ने पूर्ण करू शकतात, याचा विश्वास या संस्थेने निर्माण केला असल्याचे श्री. हनुमंतराव भोंगळे म्हणाले.
शिक्षणाधिकारी संजय कुसाळकर यांनी सावित्रीबाई फुले इंग्लिश मिडीयम स्कूलच्या कार्याचे कौतुक करताना सांगितले की, ग्रामीण भागातही दर्जेदार व मूल्याधिष्ठित शिक्षण देण्याचा संस्थेचा प्रयत्न निश्चितच स्तुत्य आहे. विद्यार्थ्यांनी ‘अरण्य’ या विषयावर सादर केलेला कलाविष्कार हा त्यांच्या सर्जनशीलतेचा आणि शिक्षकांच्या मेहनतीचे फळ आहे. कलाविष्कार हा केवळ सांस्कृतिक कार्यक्रम नसून सामाजिक जाणीव निर्माण करणारा उपक्रम आहे. शिक्षणासोबत पर्यावरणाबाबत जागरूकता निर्माण करण्याचा हा प्रयत्न निश्चितच प्रेरणादायी आहे. सावित्रीबाई फुले इंग्लिश मिडीयम स्कूल सारखें उपक्रम इतर शैक्षणिक संस्थांनीही राबवावेत, जेणेकरून विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास होऊन समाजात सकारात्मक बदल घडेल, असे मत त्यांनी व्यक्त केले व शाळेच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
यावेळी प्रसिद्ध गायिका गायत्री साळवे यांनी आपल्या मधुर आणि दमदार आवाजात ” पिचली माझी बांगडी, कृष्ण मुरारी अशा विविध गाण्यांनी मन वेधले तसेच चार सुरेल गीते सादर करून उपस्थितांची मने जिंकली. त्यांच्या सादरीकरणामुळे संपूर्ण वातावरण भारावून गेले होते. देशभक्तीपर तसेच भावगीतांच्या माध्यमातून त्यांनी प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केले. प्रत्येक गाण्यानंतर टाळ्यांचा कडकडाट होत होता. विद्यार्थ्यांसाठी त्यांचे सादरीकरण प्रेरणादायी ठरले असून कार्यक्रमाला विशेष रंगत आली.
झी टॉकीज फ्रेम हास्य कलाकार संदीप जाधव यांनी आपल्या विनोदी शैलीत उपस्थितांची मनमुराद करमणूक केली. त्यांच्या खुमासदार संवादशैली, नेमक्या टायमिंग आणि हलक्याफुलक्या विनोदांमुळे कार्यक्रमात हास्याची उधळण झाली. विद्यार्थ्यांपासून पालकांपर्यंत सर्वांनी त्यांच्या सादरीकरणाचा आनंद घेतला. त्यांच्या उपस्थितीमुळे स्नेहसंमेलनाला विशेष रंगत आणि उत्साह लाभला.
यावेळी विद्यार्थ्यांनी ‘अरण्य’ थीमवर आधारित तब्बल १८ नृत्याविष्कार सादर करत रंगमंचावर जणू हिरवाईचं सजीव जग उभं केलं. वन्यजीवांचे दर्शन, झाडांचे महत्त्व, पर्यावरण संवर्धनाचा संदेश आणि निसर्गाशी नातं जपण्याची भावना प्रत्येक सादरीकरणातून प्रभावीपणे उमटली. ताल-लयीतून साकारलेल्या या अरण्यनृत्यांनी प्रेक्षकांना मंत्रमुग्ध करत टाळ्यांचा कडकडाट उसळवला.
यावेळी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार स्कूलचे विद्यार्थी अनुष्का गायकवाड, दर्शन क्षिरसागर, आयेशा पठाण, स्वामींनी थोरात आराध्या भोरकडे, रुद्र भोरकडे, सार्थक खोकले, वैदेही जावळे, तनिष्का खोकले, तनिष्का केदारे, पूर्णिका राजुळे, अनिरुद्ध रोहम, स्वराली भोरकडे साईराज जाधव, ईश्वरी गायकवाड यांनी केले.





