कुरकुंभमध्ये थरार! जुन्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या; पिकअपची धडक देऊन कोयत्याने सपासप वार
विशेष प्रतिनिधी: रोहित जगताप (सारथी महाराष्ट्राचा)
कुरकुंभ (दौंड):
दौंड तालुक्यातील कुरकुंभ येथील मुकादमवाडी पुलावर शुक्रवारी रात्री एका तरुणाची चित्रपटात शोभेल अशा पद्धतीने निर्घृण हत्या करण्यात आली. महेश उर्फ मन्या संजय भागवत (वय २९, रा. पाटस) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. जुन्या खुनाचा बदला घेण्यासाठीच हा हल्ला करण्यात आल्याची प्राथमिक चर्चा परिसरात सुरू आहे.
नेमकी घटना काय?
मिळालेल्या माहितीनुसार, २० फेब्रुवारी २०२६ रोजी रात्री ८:१५ च्या सुमारास फिर्यादी महेश मारुती टुले, मृत महेश भागवत, युवराज शिंदे आणि राज होले हे दुचाकीवरून पाटसच्या दिशेने जात होते. सोलापूर-पुणे हायवेवरील मुकादमवाडी पुलावर आले असता, आरोपींनी त्यांना पाठीमागून पिकअप गाडीने जोराची धडक दिली. या धडकेत सर्वजण खाली पडल्यानंतर आरोपींनी महेश भागवत याच्यावर कोयता आणि सत्तूरने सपासप वार करून त्याला जागीच ठार मारले.
पाच जणांवर गुन्हा दाखल
याप्रकरणी महेश मारुती टुले (वय २५, रा. तामखडा पाटस) यांनी दौंड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी खालील आरोपींवर खुनाचा गुन्हा दाखल केला आहे:
१) संतोष शितकल
२) आनंद माकर
३) विकी शितकल
तसेच त्यांच्या इतर दोन अनोळखी साथीदारांचा पोलीस शोध घेत आहेत.
खुनाचा बदला खुनाने?
परिसरात अशी चर्चा आहे की, मृत महेश भागवत हा मागील एका खुनाच्या गुन्ह्यातील मुख्य सूत्रधार होता. त्याच खुनाचा बदला घेण्यासाठी संतोष शितकल आणि त्याच्या साथीदारांनी हा कट रचून त्याचा काटा काढल्याचे बोलले जात आहे.
या घटनेचा पुढील तपास दौंड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक गोपाळ पवार हे करत आहेत. भररस्त्यात झालेल्या या हत्याकांडामुळे पाटस आणि कुरकुंभ परिसरात दहशतीचे वातावरण पसरले आहे.
रिपोर्ट: रोहित जगताप, सारथी महाराष्ट्राचा







