रामटेक येथील नवीन बसस्थानकाच्या इमारत बांधकामात अनियमितता व निकृष्ट दर्जाचे काम सुरू असल्याचा आरोप करत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे रामटेक तालुका अध्यक्ष मनीष खोब्रागडे यांनी आज आगार प्रमुखांना निवेदन सादर केले.महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ (नागपूर विभाग) अंतर्गत सुरू असलेल्या या बांधकामात निकृष्ट दर्जाची वाळू तसेच मातीमिश्रित साहित्य वापरले जात असल्याचा आरोप निवेदनात करण्यात आला आहे. संबंधित साहित्याची अधिकृत तपासणी झाली आहे का, असा सवालही उपस्थित करण्यात आला.
बांधकामस्थळी आवश्यक सुरक्षा उपाययोजना व सूचना फलक नसल्याचेही नमूद करण्यात आले आहे. तसेच नवीन वीजमीटर न घेता, रितसर परवानगीशिवाय वीजपुरवठा घेतल्याचा आरोप करण्यात आला असून सुरक्षेच्या नियमांचे पालन होत नसल्याचे निवेदनात म्हटले आहे.
बांधकामामुळे परिसरात मोठ्या प्रमाणात धूळ उडत असून प्रवासी, नागरिक व कर्मचाऱ्यांच्या आरोग्यावर परिणाम होत असल्याचा मुद्दाही उपस्थित करण्यात आला. कामासाठी नेमलेल्या कंत्राटदार कंपनीकडून विलंब होत असल्याने सार्वजनिक सुविधेचा प्रश्न निर्माण झाल्याचेही खोब्रागडे यांनी सांगितले.या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करून संबंधित कंत्राटदार व जबाबदार अधिकाऱ्यांवर तातडीने कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
दरम्यान, रामटेकमधील स्थानिक (लोकल वेंडर) प्रलंबित पैसे त्वरित मिळवून देण्यात यश आले.यावेळी अनिकेत कराडे, प्रेमानंद गजगाटे, निहांत धमगाये, अभय वानखेडे तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.











