ठाणे : ठाणे महानगरपालिका यांच्या ५ मार्चपासून होणाऱ्या महासभांचे ऑनलाईन थेट प्रक्षेपण करण्यात यावे, अशी मागणी भाजपाच्या नगरसेविका नम्रता जयेंद्र कोळी यांनी महापौरांकडे पत्राद्वारे केली आहे. २३ फेब्रुवारी रोजी झालेल्या महासभेतील गोंधळाच्या पार्श्वभूमीवर पारदर्शकता आणि नागरिकांना माहिती मिळावी या उद्देशाने ही मागणी करण्यात आली आहे.
२३ फेब्रुवारीच्या महासभेत काही मुद्द्यांवरून गदारोळ झाला होता. दुर्दैवाने काही महत्त्वाच्या लक्षवेधी सूचना व प्रस्ताव स्वीकारले गेले नाहीत. जनहिताच्या प्रश्नांवर प्रशासनाकडून स्पष्ट खुलासा न मिळाल्यामुळे नगरसेवकांमध्ये संभ्रम निर्माण झाल्याचे नम्रता कोळी यांनी पत्रात नमूद केले आहे. सभेतील कामकाजाबाबत अनेक नागरिकांनी माहिती विचारली होती; मात्र लोकप्रतिनिधी असूनही त्यांच्या प्रश्नांचे समाधान करता आले नाही, अशी खंत त्यांनी व्यक्त केली.
सुमारे चार वर्षांनंतर महापालिकेत लोकप्रतिनिधींच्या राजवटीला सुरुवात झाली असून नागरिकांच्या अपेक्षा मोठ्या आहेत. महासभेत मांडल्या जाणाऱ्या लक्षवेधी सूचना, प्रस्ताव, प्रश्नोत्तरांची चर्चा, त्यानंतर घेतले जाणारे निर्णय तसेच प्रशासनाकडून दिली जाणारी माहिती यामध्ये पूर्ण पारदर्शकता असावी, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली आहे.
या पार्श्वभूमीवर ५ मार्चपासून होणाऱ्या महासभांचे थेट ऑनलाईन प्रक्षेपण करण्यात यावे, जेणेकरून नागरिकांना सभेतील कामकाजाची माहिती थेट पाहता येईल आणि गैरसमज टाळता येतील, असे नम्रता कोळी यांनी पत्रात नमूद केले आहे.
या संदर्भात महापालिका आयुक्त सौरभ राव तसेच सचिव मनीष जोशी यांनाही पत्र पाठविण्यात आले आहे.







