“सभागृहाचा कारभार रामभरोसे चाललाय” — लोणीकरांचा उपरोधिक टोला
मुंबई | प्रतिनिधी
मुंबई येथील विधिमंडळाच्या विधानसभा सभागृहात सुरू असलेल्या पुरवणी मागण्यांच्या चर्चेदरम्यान संबंधित मंत्र्यांची अनुपस्थिती आढळून आल्याने बबनराव लोणीकर यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण, नियोजन विभाग तसेच अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण या महत्त्वाच्या विभागांचे मंत्री आणि प्रधान सचिव सभागृहात उपस्थित नसल्याने त्यांनी शासनाच्या कार्यपद्धतीवर सवाल उपस्थित केला.
मतदारसंघाशी संबंधित अत्यंत महत्त्वाचे प्रश्न मांडले जात असताना जबाबदार मंत्रीच गैरहजर राहणे ही गंभीर बाब असल्याचे सांगत, “सभागृहाचा सगळा कारभार रामभरोसे चाललाय,” असा उपरोधिक टोला लोणीकर यांनी लगावला. पुरवणी मागण्या या केवळ आकडेवारी नसून त्या सर्वसामान्यांच्या मूलभूत गरजांशी निगडित असतात. त्यामुळे संबंधित मंत्री व वरिष्ठ अधिकारी उपस्थित राहणे आवश्यक असल्याचे त्यांनी ठामपणे नमूद केले.
परतूर मतदारसंघासाठी ठोस मागण्या
परतूर विधानसभा मतदारसंघातील प्रलंबित प्रश्न मांडताना लोणीकर यांनी पुढील मागण्या केल्या—
- ➡️ रास्त भाव दुकानदारांचे मार्जिन महागाईनुसार किमान ३०० रुपये प्रति क्विंटल वाढवावे.
- ➡️ वाटुर–जयपूर–सरकटे–वझर, तळणी–देवठाणा–उसवद–मंठा–विडोळी–पाटोदा तसेच विरेगाव–नेर–सेवली–भागडे–सावरगाव ते जिल्हा सरहद्द या प्रमुख रस्त्यांची दुरवस्था दूर करण्यासाठी तातडीने मुबलक निधी द्यावा. या रस्त्यांमुळे सुमारे १३० गावांतील नागरिकांना त्रास सहन करावा लागत असल्याचे त्यांनी सांगितले.
- ➡️ मंठा व परतूर उपजिल्हा रुग्णालयांसाठी प्रत्येकी ५० कोटी, एकूण १०० कोटी रुपयांचा निधी तात्काळ मंजूर करावा.
मूलभूत सुविधा, आरोग्य सेवा आणि व्यापारी घटकांच्या प्रश्नांवर आक्रमक भूमिका घेत लोणीकर यांनी शासनाचे लक्ष वेधले. त्यांच्या या भूमिकेमुळे सभागृहात काही काळ वातावरण तापल्याचे पाहायला मिळाले.






