
आजरा महाविद्यालयात ‘मराठी राजभाषा गौरव दिन’ उत्साहात साजरा; ग्रंथ प्रदर्शन व स्वाक्षरी मोहिमेला उस्फूर्त प्रतिसाद
आजरा: प्रतिनिधी
“आजच्या जागतिकीकरणाच्या स्पर्धेत टिकून राहण्यासाठी इंग्रजी भाषेची आवश्यकता असली, तरी मराठी भाषा हीच आपली खरी अस्मिता आणि संस्कृतीची जननी आहे. आपल्या भावना व्यक्त करण्यासाठी मराठीसारखे दुसरे प्रभावी माध्यम नाही. त्यामुळे मराठी हीच आपली खरी ओळख बनली पाहिजे,” असे प्रतिपादन उपप्राचार्य प्रा. दिलीप संकपाळ यांनी केले.
येथील आजरा महाविद्यालयात मराठी विभागाच्या वतीने ‘मराठी राजभाषा गौरव दिन’ मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला, यावेळी ते प्रमुख वक्ते म्हणून बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. अशोक सादळे होते.
विविध उपक्रमांनी मराठीचा जागर
दिवासाचे औचित्य साधून महाविद्यालयात ग्रंथ प्रदर्शन आणि ‘मराठी स्वाक्षरी मोहीम’ राबविण्यात आली. विद्यार्थ्यांनमध्ये मराठी भाषेबद्दल प्रेम निर्माण व्हावे, या उद्देशाने ही मोहीम राबवण्यात आली. कार्यक्रमाची सुरुवात कविवर्य कुसुमाग्रज यांच्या प्रतिमेच्या पूजनाने झाली. त्यानंतर डॉ. आप्पासो बुडके यांनी उपस्थित सर्वांना ‘मराठी भाषा संवर्धन शपथ’ दिली.
व्यवहाराची आणि तंत्रज्ञानाची भाषा व्हावी
आपल्या व्याख्यानात प्रा. संकपाळ पुढे म्हणाले की, “मराठी केवळ घरापुरती मर्यादित न ठेवता ती व्यवहाराची आणि तंत्रज्ञानाची भाषा बनली पाहिजे. तरुण पिढीने वाचन संस्कृती जोपासायला हवी, तरच मराठी भाषेचे भविष्य अधिक उज्वल होईल.”
विद्यार्थ्यांचा सक्रीय सहभाग
यावेळी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी कुसुमाग्रजांच्या निवडक कवितांचे बहारदार वाचन केले. यामध्ये:
अथर्व मोहिते, संचिता तरडेकर, श्रेया लटके, क्षितिजा ढोकरे, सानिका पन्हाळकर, अक्षरा कांबळे आणि सानिका गुंजाळ यांचा समावेश होता.
श्रुती कांबळे हिने ‘अभिमान माय मराठीचा’ या विषयावर अत्यंत प्रभावी भाषण केले. तिच्या या कौशल्याबद्दल प्राचार्य डॉ. सादळे यांच्या हस्ते तिचा विशेष सत्कार करण्यात आला.

मान्यवरांची उपस्थिती
याप्रसंगी मराठी विभाग प्रमुख डॉ. आनंद बल्लाळ, प्रा. विनायक चव्हाण यांनीही आपले विचार व्यक्त केले. कार्यक्रमास पर्यवेक्षक प्रा. मनोज पाटील, अधीक्षक योगेश पाटील, ग्रंथपाल प्रा. रवींद्र आजगेकर, प्रा. योगिता भोकरे, प्रा. सुषमा नलावडे, प्रा. मल्लिकार्जुन शिंत्रे, डॉ. अविनाश वर्धन यांच्यासह शिक्षक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. वैशाली देसाई यांनी केले. सूत्रसंचालन निदा इंचनाळकर हिने केले, तर समृद्धी कालेकर हिने सर्वांचे आभार मानले. सामुदायिक पसायदानाने कार्यक्रमाची सांगता झाली.




