निवृत्ती नंतरचे आर्थिक लाभ पेन्शन,आरोग्य सुविधा आणि कायदेशीर हक्काचे रक्षण करण्यासाठी सेवानिवृत्त संघटना महत्वाची भूमिका बजावते….
प्रतिनिधी :- दरीकांत कोळेकर, सारथी महाराष्ट्राचा न्यूज.
कुरुंदवाड :- निवृत्ती नंतरचे आर्थिक लाभ, पेन्शन, आरोग्य सुविधा आणि कायदेशीर हक्काचे संरक्षण करण्यासाठी सेवानिवृत्त संघटना महत्त्वाची भूमिका बजावते. राज्य सरकारी, निमसरकारी व शिक्षकांनी आपल्या निवृत्तीनंतर अडचणी सोडवण्यासाठी सेवानिवृत्त संघाचे सदस्य होणे आज काळाची गरज आहे. असे प्रतिपादन कोल्हापूर जिल्हा सेवानिवृत्त संघाचे सुरेश कांबळे यांनी केले.
शिरोळ तालुका निवृत्त सेवा संघाची नगर वाचनालयामध्ये सभा आयोजित करण्यात आली होती. त्या सभेमध्ये मार्गदर्शन करताना ते बोलत होते. अध्यक्षस्थानी जिल्हा संघाचे वसंतराव थोरात व लालासो कुंभार होते. तर अध्यक्षस्थानी महसूल विभागाचे सेवानिवृत्त अधिकारी धोंडीराम कोठावळे होते.
ते पुढे म्हणाले की, सेवानिवृत्त संघटना कर्मचाऱ्यांच्या सामुहीक हिताचे प्रतिनिधित्व करते. सेवानिवृत्तांना पेन्शन, आरोग्य व इतर फायदे यासाठी एकत्र येऊन मदत करते. कार्यक्षमता, संप्रेषण, समन्वय, अधिकार आणि जबाबदारी पार पाडते. संघटना म्हणजे सामान्य उद्दिष्ट साध्य करण्यासाठी एकत्रपणे काम करणाऱ्या व्यक्तींचा संरचित गट. हे सदस्यामधील भूमिका जबाबदारी आणि संबंध परिभाषित करण्यासाठी कार्यक्षम आणि प्रभावी काम सुलभ करण्यासाठी शासकीय पातळीवर काम करतात. यावेळी बोलताना लालासो कुंभार म्हणाले की, औपचारिक संघटना नियम आणि कार्यपद्धतीवर आधारित असते. तर अनौपचारिक संघटना लोकांच्या वृत्ती आणि भावनांवर आधारित असते. ती काम करणाऱ्या आणि एकमेकांशी जोडणाऱ्या लोकांमधील अनौपचारिक सामाजिक संपर्कावर अवलंबून असते. संघटना म्हणजे विशिष्ट ध्येय साध्य करण्यासाठी एकत्र काम करणाऱ्या लोकांचा समूह, संघटनात्मक उद्दिष्ट साध्य करण्यासाठी लोक आणि क्रियाकलापांचे गटबद्ध करण्यात अधिकार आणि जबाबदारी स्थापित करतात. आणि लोकांशी संवाद साधण्यात व्यवस्थापकाची मध्यवर्ती भूमिका बजावते.
यावेळी बोलताना वसंतराव थोरात म्हणाले की, सेवानिवृत्तीनंतर लोकांनी फिरणे, हासणे, योगा करणे, चालणे व आहारावर नियंत्रण ठेवल्यास आरोग्य चांगले राहते. आज अनेक ठिकाणी सेवानिवृत्तीनंतर ही लोक ताणतणावात राहत असतात. तो ताण कमी करण्यासाठीच लोक सध्या हास्यक्लबला जात आहेत. आणि हास्यामुळे मन प्रफुलित राहते मनावरचा ताणतणाव कमी होतो. त्यामुळे आयुष्यमान वाढते. यासाठी लोकांच्या समूहात राहणे गरजेचे आहे.
प्रारंभी स्वागत व प्रास्ताविक तालुका संघटनेचे अध्यक्ष शरद कडाळे यांनी केले. यावेळी येथील माजी लोकनियुक्त नगराध्यक्ष, जयराम बापू पाटील यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. अहवाल वाचन सदस्य शांतगोंडा पाटील यांनी केले. पाहुण्यांचा सत्कार धोंडीराम कोठावळे यांच्या हस्ते करण्यात आला. शेवटी आभार नंदकुमार सुतार यांनी मानले.
या सभेला केशव देशपांडे, बाळासो भोई. दुंडया स्वामी, सुरेंद्र कोडोले, राजमहंमद गरगरे, श्रीकांत मोहिते, अल्ताफ बाणदार, धोंडीराम कांबळे, परसराम गायकवाड, अल्लानूर मुल्ला, सुरेश कांबळे, डी.वाय. चव्हाण या मान्यवरासह सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.










