केंद्रीय मंत्री मनोहर लाल खट्टर यांच्या उपस्थितीत भारत मंडपम येथे संपन्न झाला ‘अमृत मित्र’ सोहळा
केंद्र शासनाच्या अमृत २.० अभियानांतर्गत राबविण्यात येणाऱ्या ‘अमृत मित्र’ उपक्रमात सांगली,मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिका क्षेत्रातील महिला बचत गटांनी राष्ट्रीय स्तरावर आपली मोहोर उमटवली आहे. नवी दिल्ली येथील भारत मंडपम येथे आयोजित विशेष सोहळ्यात सांगलीतील ७ महिला प्रतिनिधींनी सहभाग नोंदवून जणू दिल्ली गाजवली. महापालिकेचे आयुक्त सत्यम गांधी यांच्या विशेष प्रयत्नातून हा दिल्ली दौरा महिला बचत गटांसाठी शक्य झाला. केंद्रीय गृहनिर्माण व शहरी व्यवहार मंत्री मा. श्री. मनोहर लाल खट्टर यांच्या अध्यक्षतेखाली हा ‘अमृत मित्र’ कार्यक्रम संपन्न झाला. यामध्ये सांगलीतील तेजस्विनी महिला बचत गट आणि समर्थ महिला बचत गट यांमधील खालील महिला प्रतिनिधींचा गौरव करण्यात आला:या दोऱ्यामध्ये महिला बचत गटांच्या शिष्टमंडळामध्ये शारदा माळी, संगीता मंडले, राजश्री कोरे, वैशाली कोळी, वैशाली सर्वदे, सुलोचना कोळी आणि रेश्मा कांबळे. या महिला प्रतिनिधी सहभागी झाल्या होत्या. संघटक सदाशिव हंकारे यांनी या पथकाचे तांत्रिक नेतृत्व केले. या कार्यक्रमामुळे सांगलीतील महिलांना विविध राज्यांतील महिला बचत गटांशी संवाद साधण्याची आणि त्यांच्या यशस्वी प्रयोगांची माहिती घेण्याची संधी मिळाली. उद्यान देखभाल आणि स्वच्छतेचे काम करणाऱ्या या महिलांना आपला व्यवसाय अधिक शास्त्रशुद्ध पद्धतीने कसा वाढवावा, याचे मार्गदर्शन मिळाले. दिल्लीतील ‘भारत मंडपम’ सारख्या जागतिक दर्जाच्या वास्तूत झालेला सत्कार महिलांचा आत्मविश्वास वाढवणारा ठरला आहे.या उपक्रमासाठी उपायुक्त तथा शहर प्रकल्प अधिकारी अश्विनी पाटील, समाज विकास अधिकारी नितीश माळी, शहर अभियान व्यवस्थापक ज्योती सरवदे, मतीन अमीन आणि किरण पाटील यांनी विशेष परिश्रम घेऊन महिलांना राष्ट्रीय मंचावर जाण्याची संधी उपलब्ध करून दिली. याया यशस्वी दिल्ली दौऱ्याबद्दल आयुक्त सत्यम गांधी म्हणाले “अमृत २.० अभियानांतर्गत केवळ पायाभूत सुविधाच नव्हे, तर महिलांचे आर्थिक सक्षमीकरण करणे हे आमचे ध्येय आहे. दिल्लीतील या गौरवामुळे इतर बचत गटांनाही प्रेरणा मिळेल आणि महिला अधिक उत्साहाने शहर स्वच्छतेच्या कामात सहभागी होतील.” या संधीमुळे महिलांनी प्रशासनाचे आभार मानले असून, भविष्यात अधिक जोमाने काम करण्याचा निर्धार व्यक्त केला आहे.








