जत प्रतिनिधी:- जत तालुक्यातील उटगी व परिसरात पिण्याच्या पाण्यासह शेतीसाठी लागणाऱ्या पाण्याची तीव्र टंचाई निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर उटगी येथील युवानेते महानंतेश पाटील व माजी सरपंच भीमराय बिराजदार यांच्या नेतृत्वाखाली सांगलीचे खासदार विशाल पाटील यांना निवेदन देऊन म्हैसाळ उपसा सिंचन योजनेचे पाणी तातडीने सोडण्याची मागणी करण्यात आली.
निवेदनात म्हटले आहे की, उटगी परिसरातील शेतकरी व ग्रामस्थ पाण्याअभावी मोठ्या अडचणीत सापडले आहेत. त्यामुळे म्हैसाळ उपसा सिंचन योजनेच्या आउटलेट क्रमांक ८ ते १६ मधून पाणी सोडण्यात यावे, अशी मागणी करण्यात आली आहे. तसेच पाणी सोडण्यासाठी आवश्यक असलेला डिमांड ड्राफ्ट (डीडी) भरण्यास शेतकरी तयार असल्याचेही ग्रामस्थांनी स्पष्ट केले.
यावेळी मार्केट कमिटीचे माजी सभापती महादेव अंकलगी, तंटामुक्त अध्यक्ष सिद्राया संघ, बसवराज संघ तसेच परिसरातील अनेक ग्रामस्थ उपस्थित होते.
युवानेते महानंतेश पाटील यांनी सांगितले की, उटगी परिसरातील पाण्याचा प्रश्न गंभीर बनला असून तातडीने पाणी सोडण्याची आवश्यकता आहे. अन्यथा शेतकरी व ग्रामस्थांच्या वतीने या मागणीसाठी पुढील काळात तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही त्यांनी दिला.
दरम्यान, खासदार विशाल पाटील यांनी या प्रश्नाकडे सकारात्मक लक्ष देऊन संबंधित विभागाकडे पाठपुरावा करावा, अशी अपेक्षा उटगी परिसरातील नागरिकांनी व्यक्त केली आहे.








