शहादा – आंतरराष्ट्रीय स्तरावर इराण–अमेरिका युद्धामुळे वाढलेला तणाव आता स्थानिक बाजारपेठांवरही परिणाम करताना दिसून येत आहे. या परिस्थितीचा फटका थेट नंदुरबार जिल्ह्यातील केळी उत्पादक शेतकऱ्यांना बसला आहे.
गेल्या आठवडाभरात केळीच्या बाजारभावात क्विंटलमागे तब्बल एक हजार रुपयांची घसरण नोंदवली गेली आहे. मागील आठवड्यात शेतकऱ्यांना प्रति क्विंटल २२०० रुपये दर मिळत होते, मात्र सध्या केळीचे दर अचानक १२०० रुपयांपर्यंत खाली आले आहेत. या जवळपास हजार रुपयांच्या घसरणीमुळे शेतकऱ्यांचे आर्थिक गणित पूर्णपणे बिघडले आहे.
नंदुरबार जिल्ह्यातील शहादा, तळोदा, अक्कलकुवा, नवापूर अशा भागांमध्ये मोठ्या प्रमाणावर केळीची लागवड केली जाते. अनेक शेतकऱ्यांचे उत्पन्न मुख्यतः केळी उत्पादनावर अवलंबून असते. मात्र, सध्या दर घटल्यामुळे त्यांना खत, औषधे, मजुरी, सिंचन आणि वाहतूक खर्च यासह एकूण उत्पादन खर्चही पूर्ण करणे कठीण झाले आहे. अनेकांनी कर्ज काढून केळीची लागवड केली असल्याने सध्याच्या परिस्थितीत माल विकून देखील खर्च भागवणे अवघड असल्याची चिंता व्यक्त केली आहे.
व्यापारी व बाजारातील तज्ज्ञांच्या मते, युद्धामुळे आंतरराष्ट्रीय घडामोडी बदलल्याने केळीच्या निर्यातीवर परिणाम झाला आहे. पुरवठा जास्त असताना निर्यातीमध्ये घट झाल्यामुळे स्थानिक बाजारातही केळीचे दर कोसळले आहेत.
शेतकऱ्यांचे म्हणणे आहे की, या घसरणीला थांबवण्यासाठी शासनाने तातडीने लक्ष घालून उपाययोजना कराव्यात. आर्थिक दिलासा देण्यासाठी अनुदान, बाजार स्थिरीकरण योजना किंवा खरेदीची व्यवस्था लागू करण्याची गरज आहे.
सध्या बाजारभावातील घसरणीमुळे नंदुरबार जिल्ह्यातील केळी उत्पादक शेतकरी गंभीर अडचणीत सापडले आहेत आणि परिस्थिती लवकर सुधारावी अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.









