‘त्रिमुर्ती संदेश खालु बाजा’च्या माध्यमातून २५ वर्षे परंपरा जपणाऱ्या सनई वादकाचा गौरव — सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार यांच्या हस्ते सन्मान

मुंबई|(प्रतिनिधी:राकेश.चिलबे.) कोकणची अस्मिता आणि आगरी-कोळी संस्कृतीचा अविभाज्य भाग असलेल्या ‘खालु बाजा’ (टिमकी बाजा) या पारंपरिक लोककलेला जागतिक स्तरावर ओळख मिळवून देणाऱ्या रत्नागिरी मधिल दापोली तालुक्यातील ईळणे गावचे सुपुत्र संदेश हरिश्चंद्र मुरुडकर यांनी सनई वादनात ऐतिहासिक कामगिरी करत India Book of Records मध्ये आपले नाव सुवर्ण अक्षरात नोंदवले आहे.
मुंबईसारख्या महानगरात ‘त्रिमुर्ती संदेश खालु बाजा’ या पथकाच्या माध्यमातून गेली तब्बल २५ वर्षे ही लोकपरंपरा जिवंत ठेवण्याचे कार्य मुरुडकर करत आहेत. पारंपरिक सनई वादनातील त्यांची मेहनत, सातत्य आणि संस्कृतीप्रती असलेली निष्ठा यामुळेच त्यांना हा मानाचा सन्मान मिळाला आहे.या विशेष कामगिरीबद्दल त्यांचा सन्मान महाराष्ट्र राज्याचे सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार यांच्या हस्ते करण्यात आला.
या प्रसंगी सांस्कृतिक क्षेत्रातील मान्यवर, कलाकार आणि कोकणप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते.‘खालु बाजा’ ही केवळ लोककला नसून, कोकणातील सामाजिक आणि धार्मिक परंपरांचा आत्मा आहे.
आधुनिकतेच्या लाटेत हरवत चाललेल्या या कलेला जपण्यासाठी मुरुडकर यांचे योगदान अत्यंत मोलाचे मानले जात आहे.त्यांच्या या यशामुळे कोकणातील कलाकारांना नवी प्रेरणा मिळाली असून, पारंपरिक कलेचे संवर्धन करण्यासाठी ही कामगिरी मार्गदर्शक ठरणार आहे.
कोकणच्या लोककलेचा झेंडा उंचावला! संदेश मुरुडकर यांची ‘इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्स’मध्ये ऐतिहासिक नोंद








