प्रतिनिधी :-
सरकारने रेशन कार्डधारकांसाठी दिलासादायक निर्णय घेत मोठी घोषणा केली आहे. दारिद्र्यरेषेखालील नागरिकांना केंद्र सरकारकडून दिल्या जाणाऱ्या मोफत धान्य योजनेअंतर्गत आता एप्रिल महिन्यात तिप्पट धान्य मिळणार आहे.
केंद्र सरकारच्या अन्न व सार्वजनिक वितरण विभागाने याबाबत माहिती दिली असून, एप्रिल महिन्यात लाभार्थ्यांना तीन महिन्यांचे धान्य एकत्र देण्यात येणार आहे. म्हणजेच एप्रिल, मे आणि जून या कालावधीतील धान्य एकाच वेळी वितरित केले जाणार आहे. त्यामुळे लाभार्थ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.
लाभार्थी नागरिकांना त्यांच्या सोयीच्या वेळेनुसार जवळच्या रेशन दुकानातून हे धान्य घेता येणार आहे. मात्र, सरकारने हा निर्णय नेमका का घेतला याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत माहिती दिलेली नाही.
दरम्यान, काही दिवसांपूर्वी केंद्र सरकारने राज्य सरकारांना रेशन वितरणाबाबत महत्त्वाचे निर्देश दिले होते. जूनपर्यंतचे धान्य आगाऊ स्वरूपात उचलण्यास सांगण्यात आले होते. केंद्राकडील साठ्यातून गहू आणि तांदूळ घेण्याचे निर्देश देण्यात आले होते.
यामागील मुख्य कारण म्हणजे केंद्र सरकार लवकरच नवीन गहू खरेदी प्रक्रिया सुरू करणार आहे. त्यामुळे गोदामांमध्ये नवीन धान्य साठवण्यासाठी जागा उपलब्ध व्हावी, यासाठी राज्यांनी आधीच तीन महिन्यांचे धान्य उचलावे, असा निर्णय घेण्यात आला आहे.
सध्या रेशन कार्डधारकांना दर महिन्याला गहू आणि तांदूळ मोफत दिले जातात. मात्र, एप्रिल महिन्यात हेच धान्य तीन पट प्रमाणात एकाच वेळी मिळणार असल्याने नागरिकांमध्ये समाधान व्यक्त केले जात आहे.






