मारेगाव प्रतिनिधी :-र्डी ते वणी या मुख्य मार्गावर अपघाताचा धोका वाढल्याची गंभीर बाब समोर आली आहे. या मार्गालगत असलेल्या ‘फिस्की’ जंगलाच्या परिसरात रस्ता अत्यंत अरुंद असल्याने वाहनचालकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे.
माहितीनुसार, हा रस्ता क्रमांक 317 असून मच्छिंद्र गावालगतचा हा भाग विशेषतः धोकादायक ठरत आहे. रस्ता अरुंद असल्यामुळे वाहतुकीत कोंडी निर्माण होते. त्यातच पावसाळ्यात रस्त्याच्या कडेला चिखल साचत असल्याने परिस्थिती आणखी बिकट होते. यामुळे ये-जा करणाऱ्या प्रवाशांच्या सुरक्षिततेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
या समस्येमुळे स्थानिक नागरिकांनी आणि मार्डी सर्कलमधील जनतेने एकजूट दाखवत रस्ता रुंदीकरणाची मागणी जोर धरली आहे. तसेच, या ठिकाणी उड्डाण पुल (फ्लायओव्हर) उभारण्यात यावा, अशीही मागणी करण्यात येत आहे.
यासंदर्भात मारेगाव तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले असून संबंधित प्रशासनाने त्वरित याची दखल घेऊन आवश्यक ती कार्यवाही करावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. सध्या या मार्गावरील धोकादायक परिस्थिती लक्षात घेता प्रशासनाने तत्काळ उपाययोजना करणे गरजेचे असल्याचे मत व्यक्त केले जात आहे.






