श्रीगोंदा प्रतिनिधी 🖊️
श्रीगोंदा शहरातील पारगाव रस्त्यावरील महात्मा फुले उद्यानासमोर २१ मार्च रोजी रात्री सुमारे पावणे नऊच्या सुमारास खंडणी देण्यास नकार दिल्यामुळे एका महिला व्यावसायिकेला लोखंडी गज व लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केल्याची गंभीर घटना घडली. या घटनेमुळे शहरात संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी पूनम दिनेश शिंदे या “भरकादेवी आयस्क्रीम” या त्यांच्या दुकानावर एकट्याच होत्या. त्या वेळी त्यांच्या पती शेख महंमद हे रमजान ईदनिमित्त महंमद महाराज मंदिर येथे गेले होते. याच संधीचा फायदा घेत आरोपी बाहुल्या गुलाब काळे हा इसम तेथे आला. त्याच्यासोबत त्याची आई संगीता काळे, पत्नी तसेच दोन अनोळखी महिला देखील होत्या.
आरोपींनी शिंदे यांना “ही जागा माझ्या ताब्यात आहे, येथे दुकान लावायचे असल्यास दरमहा ५० हजार रुपये द्यावे लागतील,” अशी मागणी करत धमकावले. यावर शिंदे यांनी संबंधित जागा ही श्रीगोंदा नगरपरिषदेची असल्याचे सांगत खंडणी देण्यास नकार दिला.
या नकारामुळे संतप्त झालेल्या बाहुल्या काळे याने हातातील लोखंडी गजाने शिंदे यांच्या हातावर, पाठीवर व कंबरेवर मारहाण करून त्यांना जखमी केले. त्यानंतर त्याची आई, पत्नी व इतर महिलांनी त्यांना खाली पाडून लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. शिंदे यांनी आरडाओरड केल्यानंतर परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेत त्यांना या मारहाणीतून वाचवले.
घटनेनंतरही आरोपींनी “पन्नास हजार रुपये दिले नाहीत तर येथे दुकान लावू देणार नाही, तसेच तुला आणि तुझ्या नवऱ्याला जिवंत सोडणार नाही,” अशी धमकी दिल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.
या प्रकरणी पूनम शिंदे यांच्या तक्रारीवरून श्रीगोंदा पोलिस ठाण्यात बाहुल्या गुलाब काळे, संगीता काळे, त्यांची पत्नी व दोन अनोळखी महिलांविरोधात खंडणी मागणे, मारहाण करणे व जीवे मारण्याची धमकी देणे अशा विविध कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ग्रामस्थांमध्ये संताप; गावबंदाबाबत बैठक
या घटनेची माहिती मिळताच रात्री उशिरा मोठ्या संख्येने नागरिक श्रीगोंदा पोलिस ठाण्याबाहेर जमले होते. आरोपींना तात्काळ अटक करून कठोर कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली. तसेच या भागातील काही व्यक्तींमुळे नागरिकांना वारंवार त्रास होत असल्याचा आरोप करत निषेध व्यक्त करण्यात आला.
या पार्श्वभूमीवर आज श्रीगोंदा शहरातील महंमद महाराज मंदिर येथे ग्रामस्थांची महत्त्वपूर्ण बैठक आयोजित करण्यात आली असून, गावबंद करण्याबाबत निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे.
सदर घटनेचा सर्व स्तरातून निषेध व्यक्त होत असून, शहरातील कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.










