माहूर प्रतिनिधी 🖊️
माहूर तालुक्यातील टाकळी नवी येथील जिल्हा परिषद शाळेने १०० टक्के पटसंख्या गाठण्याच्या उद्देशाने एक अभिनव उपक्रम राबवत संपूर्ण गावाचे लक्ष वेधून घेतले. “शाळेत पाठवा, शाळेत पाठवा, आपली मुले शाळेत पाठवा!” असा जोरदार नारा देत विद्यार्थ्यांनी गावात रॅली काढली आणि शिक्षणाचे महत्त्व नागरिकांपर्यंत पोहोचवले.
या उपक्रमाचे खास वैशिष्ट्य म्हणजे एकाच ठिकाणी प्रदर्शन न भरवता गावातील विविध चौकांमध्ये वेगवेगळ्या विषयांचे प्रदर्शन मांडण्यात आले. प्रत्येक चौकात विद्यार्थ्यांनी नागरिकांना संबंधित विषयांची माहिती देत ज्ञानगंगा प्रवाहित केली.
विषयानुसार विद्यार्थ्यांचे सादरीकरण:
- गणित: धमप्रिया घाळवट
- हिंदी: परिणीती कांबळे
- भूगोल: तन्वी बेंद्रे
- मराठी व इंग्रजी: कु. जान्हवी भगत
- विज्ञान: समर्थ चिवटे व जान्हवी भगत
- इतिहास: दिव्यांका खाडे
कार्यक्रमाची सुरुवात सामूहिक राष्ट्रगीताने करण्यात आली. त्यानंतर विद्यार्थ्यांनी गावातून रॅली काढून पालकांना आपल्या मुलांना नियमित शाळेत पाठवण्याचे आवाहन केले. उपक्रमाच्या शेवटी विद्यार्थ्यांनी ‘सामूहिक भेळ’ तयार करून सहकार्य आणि आनंदातून शिक्षण घेण्याचा संदेश दिला.
रॅलीमध्ये विद्यार्थ्यांनी साकारलेल्या महापुरुषांच्या वेशभूषाही विशेष आकर्षण ठरल्या. अपूर्व भवरे यांनी महात्मा फुले, स्वराज कांदे यांनी संत गाडगे बाबा आणि खुशी घाळवट यांनी सावित्रीबाई फुले यांची भूमिका साकारत गावकऱ्यांचे लक्ष वेधून घेतले.
या उपक्रमाला शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष रुद्रशिल भवरे, डॉ. आनंद अडकिने, राहुल राऊत तसेच सावित्रीबाई शिक्षण समितीचे सदस्य महेंद्र घाळवट, निलेश कांदे, सचिन बियाळे, नामदेव आडे, संतोष गिरी आणि अनंता राऊत यांची उपस्थिती लाभली.
मुख्याध्यापक चेवटे सर आणि श्री. खोंडे सर यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम यशस्वीपणे पार पडला. १०० टक्के हजेरीचे उद्दिष्ट गाठण्यासाठी शाळेने राबवलेल्या या प्रयत्नांचे सर्वत्र कौतुक होत आहे.


