येवला प्रतिनिधी :
येवला तालुक्यातील दुर्गम भागातील वाघाळे येथील ऋतुजा अनिल वाणी हिने महाराष्ट्र पोलिस दलात स्थान मिळवत आपल्या कुटुंबासह गावाचे नाव उज्वल केले आहे. तिच्या या यशामुळे संपूर्ण परिसरात अभिमानाचे वातावरण निर्माण झाले आहे.
ऋतुजाचे वडील अनिल वाणी व आई अनिता वाणी हे साधे शेतकरी असून त्यांनी अत्यंत कष्टाने शेती करत आपल्या मुलीचे शिक्षण पूर्ण केले. आई-वडिलांच्या कष्टांची जाणीव ठेवत ऋतुजाने मेहनत, चिकाटी आणि जिद्दीच्या जोरावर हे यश संपादन केले. दुर्गम भागातील एका छोट्याशा गावातील शेतकऱ्याची मुलगी पोलिस दलात दाखल होणे ही बाब गावासाठी गौरवाची ठरली आहे.
तिने छत्रपती संभाजीनगर येथे पोलिस दलात रुजू होत आपल्या स्वप्नांना यशस्वी रूप दिले. तिच्या या कामगिरीबद्दल वाघाळे गावासह पंचक्रोशीतून तिच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत असून सर्व स्तरातून कौतुक होत आहे.
ऋतुजाच्या यशानिमित्त विविध मान्यवरांनी तिचा व तिच्या आई-वडिलांचा सत्कार केला. यामध्ये मेजर दिलीप शिंदे (शहीद दीपक शिंदे अकादमी), विजय जेजुरकर, आण्णासाहेब सोमासे, समाधान रोठे, सुनील थोरात, नागनाथ सोमासे आदींचा समावेश होता.
यावेळी मान्यवरांनी ऋतुजाच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देत, ग्रामीण भागातील मुलींनीही मोठी स्वप्ने पाहून ती पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करावेत, असा संदेश दिला.











