भोकरदन:
आज दिनांक २२ मार्च २०२६ रोजी सुरंगली (ता. भोकरदन, जि. जालना) येथे जागतिक पाणी दिन उत्साहात साजरा करण्यात आला. ISAP इंडिया फाऊंडेशन व PRIF यांच्या संयुक्त विद्यमाने तसेच ‘समृद्ध शेतकरी प्रकल्पा’ अंतर्गत हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला.
कार्यक्रमाला तालुका कृषी अधिकारी अमोल शिंदे, कृषी सहाय्यक उषा उबाळे, तसेच ISAP इंडिया फाऊंडेशनचे रिजनल मॅनेजर लक्ष्मीकांत दुधगावकर प्रमुख उपस्थित होते. याशिवाय गावातील उद्योजक योगेश जाधव यांचीही विशेष उपस्थिती होती.
यावेळी शेतकऱ्यांना पाणी संवर्धनाचे महत्त्व पटवून देण्यात आले. बदलत्या वातावरणामुळे पीक पद्धतीत बदल करणे गरजेचे असल्याचे सांगण्यात आले. ठिबक सिंचनाचा वापर, शेतात CCT, DCT, बांधबंदिस्ती करणे यामुळे जमिनीची धूप कमी करता येते, असे मार्गदर्शन करण्यात आले. तसेच शासनाच्या विविध योजनांची माहिती देऊन शेतकऱ्यांनी महाविस्तार AI या अॅपचा वापर करून पीक व पाण्याचे नियोजन करावे, असे आवाहन करण्यात आले.
लक्ष्मीकांत दुधगावकर यांनी ‘समृद्धी शेतकरी प्रकल्पा’ अंतर्गत सुरू असलेल्या उपक्रमांची माहिती देताना अवजार बँकेचे महत्त्व सांगितले. बूम स्प्रेअर व मक्का थ्रेशर यांसारख्या आधुनिक उपकरणांचा वापर करून शेती अधिक उत्पादनक्षम करता येते, असे त्यांनी स्पष्ट केले.
यावेळी युवा उद्योजक योगेश जाधव यांनी स्वतःच्या शेतातील प्रयोगांच्या माध्यमातून कमी खर्चात जास्त उत्पादन कसे घ्यावे, तसेच माती परीक्षणाचे महत्त्व याबाबत मार्गदर्शन केले.
कार्यक्रमात उपस्थित शेतकऱ्यांना माती परीक्षण प्रमाणपत्रांचे वाटप करण्यात आले. ISAP इंडिया फाऊंडेशनचे जिल्हा समन्वयक सिद्धार्थ गवई यांनी सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन केले.
या कार्यक्रमासाठी योगेश बुलगे (जिल्हा समन्वयक, जालना) यांनी आयोजन केले होते. कार्यक्रमाला गावचे प्रथम नागरिक काळे सर तसेच भाऊसाहेब काळे, राजेंद्र धनवई, प्रमोद सोनवणे, भास्कर दौड, विनोद जयस्वाल, किरण लांडगे, प्रवीण पन्हाळे, रामेश्वर लाड यांच्यासह मोठ्या संख्येने शेतकरी उपस्थित होते.
जागतिक पाणी दिनानिमित्त शेतकऱ्यांनी पाणी संवर्धनाच्या उपाययोजना अंगीकारून शेती अधिक समृद्ध करावी, असा संदेश या कार्यक्रमातून देण्यात आला.







