सेलू (प्रतिनिधी):
सेलू परिसरात पकडण्यात आलेल्या मादी बिबट्याच्या मृत्यूची धक्कादायक घटना समोर आल्यानंतर वनविभागाच्या कार्यपद्धतीवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषी अधिकारी व कर्मचाऱ्यांवर तातडीने निलंबनाची कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
हिंगणी येथे आयोजित ‘छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियान’ शिबिरात उपस्थित जिल्हाधिकारी श्रीमती वान्मथी सी यांना निवेदन देण्यात आले. हे निवेदन गोविंद वामन पेटकर (मु.पो. बोरी, ता. सेलू, जि. वर्धा) यांनी सादर केले आहे.
घटना काय?
दि. २६ फेब्रुवारी २०२६ रोजी दुपारी सेलू शहरातील गजानन नगरी परिसरात एक मादी बिबट्या आढळून आली होती. वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेऊन नागरिकांना संरक्षण दिले. रात्री सुमारे ९.३० वाजता बिबट्याला जिवंत पकडल्याची माहिती देण्यात आली होती. मात्र, त्यानंतर बिबट्याचा मृत्यू झाल्याने संशय निर्माण झाला आहे.
व्हायरल व्हिडिओमुळे खळबळ
सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या एका व्हिडिओमध्ये जाळ्यात अडकलेल्या बिबट्याच्या अंगावर वनरक्षक पाय ठेवून उभा असल्याचे दिसत आहे. या अमानवी वर्तनाचा निषेध करत कारवाईची मागणी करण्यात आली आहे.
महत्त्वाचे प्रश्न उपस्थित
निवेदनात पुढील गंभीर प्रश्न उपस्थित करण्यात आले आहेत:
- बिबट्याला पकडताना National Tiger Conservation Authority (NTCA) च्या मार्गदर्शक तत्त्वांचे पालन झाले का?
- बिबट्याला बेशुद्ध करण्यासाठी डार्टचा वापर झाला होता का?
- रेस्क्यू ऑपरेशनदरम्यान पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांची उपस्थिती होती का?
- बिबट्याला मृत घोषित कोणी केले व शवविच्छेदन कोणाच्या देखरेखीखाली झाले?
- हुसकावून लावणे शक्य असताना पकडण्याची घाई का करण्यात आली?
इतर मुद्द्यांकडेही लक्ष वेधले
वनविभागाकडून ‘लाईन जलाई’ व कटाईची कामे वेळेत न झाल्याने वनव्याचा धोका वाढल्याचेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे. तसेच जंगलातील पाणवठ्यांमध्ये पाण्याचा अभाव असल्याने वन्यप्राणी गावाकडे येत असल्याचे सांगण्यात आले.
मागण्या काय?
- संपूर्ण घटनेची निष्पक्ष चौकशी करावी
- शवविच्छेदनाचे फोटो, व्हिडिओ व अहवाल सादर करावा
- दोषी अधिकारी-कर्मचाऱ्यांवर कठोर कारवाई करावी
या निवेदनाच्या प्रती अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक (नागपूर), मुख्य वनसंरक्षक (वनवृत्त नागपूर), उपवनसंरक्षक (वर्धा) तसेच बोर व्याघ्र प्रकल्पाच्या अधिकाऱ्यांना पाठवण्यात आल्या आहेत.
या प्रकरणात प्रशासन काय भूमिका घेते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.







