श्रीगोंदा प्रतिनिधी :
दरवर्षीप्रमाणे २४ डिसेंबर रोजी राष्ट्रीय ग्राहक दिन आणि १५ मार्च रोजी जागतिक ग्राहक दिन साजरा करण्याचे शासनाचे स्पष्ट आदेश असतानाही श्रीगोंदा तालुक्यात यंदा जागतिक ग्राहक दिनाचा कार्यक्रम न झाल्यामुळे ग्राहक संघटनेचे पदाधिकारी आक्रमक झाले आहेत.
महाराष्ट्र शासनाच्या अन्न व पुरवठा विभागाच्या आदेशानुसार जिल्हाधिकारी आणि जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व तालुक्यांत हा दिन साजरा केला जातो. मात्र, १५ मार्चनंतर आठ दिवस उलटूनही श्रीगोंद्यात कोणताही कार्यक्रम आयोजित करण्यात आला नाही, असा आरोप करण्यात आला आहे.
यासंदर्भात पुरवठा अधिकारी ज्ञानेश्वर कोरे यांनी “१५ मार्च रोजी रविवार असल्याने कार्यक्रम कसा घ्यायचा?” असा प्रश्न उपस्थित करत नंतर तारीख कळवू असे सांगितल्याचा दावा ग्राहक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी केला आहे.
अखिल भारतीय ग्राहक पंचायतीचे जिल्हा सहसचिव जितेंद्र पितळे यांनी प्रशासनावर गंभीर आरोप करत सांगितले की, गेल्या २०-२२ वर्षांपासून ग्राहक दिन औपचारिक पद्धतीने साजरा केला जातो. शासनाकडून मिळणाऱ्या निधीचा योग्य वापर होत नसून अनेक अधिकारी या कार्यक्रमांकडे दुर्लक्ष करतात.
तसेच, ग्राहकांच्या समस्या मांडण्यासाठी संघटनेचे कार्यकर्ते सातत्याने प्रयत्न करत असतानाही तहसीलदार, पुरवठा अधिकारी आणि इतर प्रशासनाकडून सहकार्य मिळत नसल्याची खंत त्यांनी व्यक्त केली. यामुळे तालुक्यात सर्वसामान्य नागरिकांचे प्रश्न प्रलंबित राहून भ्रष्टाचार वाढत असल्याचा आरोपही त्यांनी केला.
दरम्यान, ग्राहक पंचायतीचे तालुकाध्यक्ष अनंता पवार यांनी इशारा दिला की, लवकरात लवकर जागतिक ग्राहक दिनाचा कार्यक्रम आयोजित न केल्यास तहसील कार्यालयासमोर उपोषण आणि जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांच्या कार्यालयावर घेराव घालण्यात येईल.
या वेळी प्रदीप डहाळे, शिवाजी साळुंके, सुरेश पिपाडा, गणेश लाढाणे, संतोष रोडे, दत्तात्रय हिरडे, प्रमोद पवार, किरण शिंदे यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते.
👉 आता प्रशासन या प्रकरणाकडे किती गांभीर्याने लक्ष देते आणि ग्राहकांना न्याय मिळतो का, याकडे तालुक्याचे लक्ष लागले आहे.








