श्रीगोंदा :- प्रतिनिधी
श्रीगोंदा शहरासह संपूर्ण तालुक्यात रमजान ईद (ईद-उल फित्र) शनिवार (दि.२१ मार्च) रोजी मोठ्या उत्साहात आणि शांततेत साजरी करण्यात आली. सकाळी १० वाजता शहरातील आनंदकर मळा येथील ईदगाह मैदानावर मौलाना जैनुद्दीन आतार यांच्या मार्गदर्शनाखाली सामुदायिक नमाज अदा करण्यात आली. या नमाजसाठी शहर व तालुक्यातील हजारो मुस्लिम बांधव उपस्थित होते. महिलांची सामुदायिक नमाज सुफी संत शेख महंमद बाबा दर्गाह येथे पार पडली.
रमजान महिन्यातील रोजांच्या समाप्तीनंतर ईद साजरी केली जाते. ३० दिवसांच्या उपवासानंतर शुक्रवारी सायंकाळी चंद्रदर्शन झाल्याने शनिवारी ईद साजरी करण्यात आली. शहरातील विविध मशिदींमध्ये सकाळपासूनच नमाज पठणासाठी व्यवस्था करण्यात आली होती.
ईदगाहवरील सामुदायिक नमाजनंतर देशाची समृद्धी, शांतता आणि धार्मिक सौहार्द यासाठी अल्लाहकडे प्रार्थना करण्यात आली. नमाजानंतर कब्रस्तान व दर्गाह येथे भाविकांनी दर्शनासाठी मोठी गर्दी केली होती. घरोघरी शीरखुर्मा, गुलगुले यांसारख्या पारंपरिक पदार्थांचा आस्वाद घेतला गेला.
या दिवशी मुस्लिमांसह इतर समाजबांधवांनीही एकमेकांना गळाभेट देत ईदच्या शुभेच्छा दिल्या. यामुळे शहरात सामाजिक ऐक्य आणि बंधुभावाचे सुंदर चित्र पाहायला मिळाले.
ईदगाह येथे माजी मंत्री बबनराव पाचपुते, घनश्याम शेलार, मनोहर पोटे, संजय खेतमाळीस, अक्षय अनभुले, शहाजी खेतमाळीस, एम. डी. शिंदे, प्रशांत गोरे, दादा औटी, नानासाहेब आंदनकर, अनिल महाराज औटी, अरविंद कापसे, नाना शिंदे, मुकुंद सोनटके, भाऊसाहेब खेतमाळीस, दिपक शिंदे, रावसाहेब घोडके, अशोक आळेकर, योगेश भोसले यांच्यासह अनेक मान्यवरांनी उपस्थित राहून मुस्लिम बांधवांना शुभेच्छा दिल्या.
कार्यक्रमाचे आयोजन जामा मस्जिद ट्रस्टच्या वतीने करण्यात आले होते. तसेच ईद शांततेत पार पडावी यासाठी पोलीस निरीक्षक किरण शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली शहरात कडक पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
🔶 चौकट :
सायंकाळी ७ वाजता सुफी संत शेख महंमद बाबा दर्गाह येथे ट्रस्ट आणि नगरसेवक आमीनमाई शेख यांच्या वतीने हिंदू-मुस्लिम बांधवांसाठी ईद मिलन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात सर्व समाजातील नागरिकांनी सहभाग घेत शीरखुर्मा, गुलगुले, भजी यांचा आस्वाद घेत एकमेकांना शुभेच्छा दिल्या.








