परतूर विधानसभा मतदारसंघातील संजय गांधी व श्रावणबाळ योजनेंतर्गत लाभ घेणाऱ्या दिव्यांग लाभार्थ्यांनी आपले मानधन सुरळीत सुरू ठेवण्यासाठी ई-आधार कार्ड व ऑनलाइन दिव्यांग प्रमाणपत्र तहसील कार्यालयात सादर करावे, असे आवाहन माजी मंत्री तथा आमदार बबनराव लोणीकर यांनी केले आहे.
प्रसिद्धीपत्रकात त्यांनी नमूद केले की, परतूर तालुक्यातील १६५, मंठा तालुक्यातील १७७ तसेच जालना ग्रामीण तालुक्यातील नेर व शेवली परिसरातील ३५ दिव्यांग लाभार्थ्यांनी अद्ययावत ऑनलाइन दिव्यांग प्रमाणपत्र आणि ई-आधार कार्ड तात्काळ संबंधित तहसील कार्यालयात जमा करणे आवश्यक आहे.
दिव्यांग लाभार्थ्यांचे मानधन थांबू नये आणि योजनांचा लाभ अखंडित सुरू राहावा, यासाठी ही प्रक्रिया अत्यंत महत्त्वाची असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. संजय गांधी व श्रावणबाळ योजनेचा सातत्याने लाभ मिळण्यासाठी संबंधित कागदपत्रे अद्ययावत असणे गरजेचे आहे, असेही त्यांनी सांगितले.
तसेच, सर्व दिव्यांग बांधवांनी याबाबत जागरूक राहून वेळेत कागदपत्रे सादर करावीत, जेणेकरून कोणत्याही अडचणीशिवाय शासनाच्या योजनांचा लाभ मिळत राहील, असे आवाहनही आमदार लोणीकर यांनी शेवटी केले आहे.








