खर्डी (प्रतिनिधी) : खर्डी येथील ग्रामपंचायत हद्दीत तुंबलेल्या गटारी, साचलेला कचरा आणि दुर्गंधीमुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर बनला असून याविरोधात माजी सदस्य निखिल विनायक बेंडकुळे यांनी सोमवार (दि. २३ मार्च २०२६) पासून आमरण उपोषणाला सुरुवात केली आहे.
गेल्या सहा महिन्यांपासून स्वच्छतेच्या समस्येबाबत वारंवार तक्रारी करूनही ग्रामपंचायतीने कोणतीही ठोस कारवाई केली नसल्याचा आरोप करण्यात येत आहे. तुंबलेल्या गटारी व साचलेल्या घाणीमुळे डेंग्यू, मलेरिया यांसारख्या आजारांचा धोका वाढला असून नागरिकांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होत असल्याची चिंता व्यक्त केली जात आहे.
या पार्श्वभूमीवर ग्रामपंचायत कार्यालयासमोर सुरू असलेल्या उपोषणाला नागरिकांचा मोठा पाठिंबा मिळत आहे. दरम्यान, सर्व वाड्यांमधील गटारी व नाले स्वच्छ करणे, प्रधानमंत्री आवास योजनेतील लाभार्थ्यांना घरबांधणी परवानगी देणे तसेच इंदिरा आवास योजनेतील लाभार्थ्यांना आवश्यक कागदपत्रे देण्याच्या प्रमुख मागण्या करण्यात आल्या आहेत.
या आंदोलनाला यतीन दांडगे यांनी जाहीर पाठिंबा दिला असून प्रशासनाने तात्काळ दखल न घेतल्यास उपोषण अधिक तीव्र करण्याचा इशारा देण्यात आला आहे.









