आजरा (प्रतिनिधी) : आजरा तालुक्यातील सिरसंगी परिसरात रानटी Asian Elephant (हत्ती) पुन्हा एकदा भरवस्तीत शिरून धुमाकूळ घातल्याने भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. रविवारी पहाटे ३ वाजताच्या सुमारास हत्तीने घराशेजारी उभी असलेली स्कूल बस उलटवून टाकली, तर एका चारचाकी वाहनाचेही नुकसान केले.
मिळालेल्या माहितीनुसार, बाबुराव बुडके यांच्या घराशेजारी गडहिंग्लज येथील ‘श्रीपतराव शिंदे शिक्षण समूहा’ची बस उभी होती. हत्तीने जोरदार धडक देत ही बस उलटवून टाकली. तसेच, अनिल निकम यांची ओम्नी कार काजू फॅक्टरीशेजारी उभी असताना तिच्या मागील काचेची तोडफोड करण्यात आली. यापूर्वीही दहा दिवसांपूर्वी बैलगाडीचे नुकसान झाल्याची घटना घडली होती.
दरम्यान, या हत्ती आणि Gaur (गवा) यांच्या कळपामुळे शेतीचे मोठे नुकसान होत आहे. गेल्या १५ दिवसांत किणे व सिरसंगी परिसरातील सुमारे ४ ते ५ एकर ऊस पिकाचे नुकसान झाले असून पाईपलाईन, पाण्याच्या टाक्या तसेच केळी व काजूच्या झाडांचेही नुकसान झाले आहे. त्यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडले असून संताप व्यक्त करत आहेत.
वन विभागाच्या गस्ती पथकाच्या कार्यक्षमतेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. “गस्ती पथक असते कुठे?” असा संतप्त सवाल ग्रामस्थ विचारत आहेत, कारण गस्ती असूनही हत्ती वारंवार वस्तीत शिरून नुकसान करत आहे.
दरम्यान, वन विभागाकडून मिळणारी नुकसानभरपाई अत्यंत अपुरी असल्याची तक्रार करत शेतकऱ्यांनी “आमची शेतीच भाडेतत्त्वावर घ्यावी,” अशी संतप्त मागणी केली आहे. सततच्या या उपद्रवामुळे सिरसंगी परिसरातील शेतकरी मेटाकुटीला आले असून प्रशासनाने तातडीने ठोस उपाययोजना कराव्यात, अशी मागणी होत आहे.








