चांदवड (प्रतिनिधी): नाशिक जिल्ह्यातील चांदवड येथील ऐतिहासिक होळकर वाडा येथे सहावे राष्ट्रीय आदिवासी धनगर साहित्य संमेलन शनिवार व रविवार, ११ व १२ एप्रिल २०२६ रोजी उत्साहात आयोजित करण्यात आले आहे. या संमेलनाच्या अध्यक्षपदी डॉ. प्रकाश महानवर (कुलगुरू, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ) यांची निवड करण्यात आली असल्याची माहिती संस्थापक अध्यक्ष प्राचार्य डॉ. अभिमन्यू टकले यांनी दिली.
या संमेलनाचे कार्यवाहक प्राचार्य दत्तात्रय बारगळ असून संयोजक म्हणून बापूसाहेब शिंदे कार्य पाहणार आहेत. मार्गदर्शक म्हणून बाळासाहेब कर्णवर पाटील यांचे मार्गदर्शन लाभणार आहे. उद्घाटन समारंभाचे प्रमुख आकर्षण म्हणजे युवा नेते गोपीचंद पडळकर यांच्या हस्ते होणारे उद्घाटन होय.
🎉 भव्य उद्घाटन आणि ग्रंथदिंडी
साहित्य संमेलनाची सुरुवात पारंपरिक ग्रंथदिंडीने होणार असून तिचे उद्घाटन श्रीमंत अमरजीत बारगळ राजे यांच्या हस्ते होईल. उद्घाटन सोहळा दीपप्रज्वलन व “यळकोट यळकोट जय मल्हार”च्या गजरात पार पडणार आहे.
या प्रसंगी राम शिंदे, सुधीर दास महाराज, उत्तम कांबळे, रामराव वडकुते यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
📚 साहित्यिकांसाठी खुला मंच
या संमेलनात सर्व जाती-धर्मातील साहित्यिकांना आपले विचार मांडण्याची संधी दिली जाणार आहे. तसेच उद्घाटन सोहळ्यात नव्या पुस्तकांचे प्रकाशन व विविध क्षेत्रात उत्कृष्ट कार्य करणाऱ्या मान्यवरांचा सन्मान करण्यात येणार आहे.
🏆 राज्यस्तरीय पुरस्कारांचे वितरण
संमेलनात विविध क्षेत्रातील मान्यवरांना पुरस्कार देऊन गौरविण्यात येणार आहे. यामध्ये संजीवन खांडेकर, सिद्धारूढ बेडूगणर, रूपाली लंभाते, प्रवीण काकडे, गणेश पुजारी, अॅड. बळवंतराव खोत, पवन थोटे, डॉ. महादेव बनसुडे, गोविंद गोरे यांचा समावेश आहे. पुरस्काराचे स्वरूप शाल, श्रीफळ, फेटा, सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र असे राहणार आहे.
🗣️ परिसंवाद व चर्चासत्र
रविवार, १२ एप्रिल रोजी सकाळी १० ते दुपारी ३ या वेळेत विविध विषयांवर परिसंवाद आयोजित करण्यात आला आहे. धनगर समाजाची शैक्षणिक स्थिती, मेंढपाळ व्यवसायाची स्थिती तसेच अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशताब्दीवर विशेष व्याख्याने होणार आहेत.
🎤 समारोप सोहळा
दुपारी ३ ते ५ या वेळेत समारोप कार्यक्रम होणार असून अध्यक्षपदी बाळासाहेब पाटील (IPS) तर उद्घाटक म्हणून डॉ. यशपाल भिंगे उपस्थित राहणार आहेत. प्रमुख उपस्थितीत बच्चू कडू, दिलीप येडतकर, रेश्मा पुणेकर यांचा समावेश असेल.
समारोपावेळी विविध ठराव मांडले जाणार असून उर्वरित पुरस्कारांचे वितरण व मान्यवरांचे मार्गदर्शन होईल.
👉 या भव्य साहित्य संमेलनासाठी राज्यभरातून साहित्यिक, अभ्यासक व समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित राहणार असल्याची माहिती आयोजकांनी दिली आहे.











