मुंबई (प्रतिनिधी): मुंबई येथील दादर स्थानक वरून सुटणारी कोकणवासीयांसाठी अत्यंत महत्त्वाची ‘दादर-रत्नागिरी पॅसेंजर’ गाडी बंद करण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाच्या विचाराधीन असल्याने वाद निर्माण झाला आहे. या गाडीचा स्लॉट ‘दादर-गोरखपूर एक्सप्रेस’साठी वापरण्याची शक्यता व्यक्त होत आहे.
या निर्णयावर महाराष्ट्र नवनिर्माण सेनाचे नेते संदीप देशपांडे यांनी तीव्र आक्षेप घेत रेल्वे प्रशासनावर जोरदार टीका केली आहे.
🚆 काय आहे नेमका वाद?
गेल्या अनेक वर्षांपासून ‘दादर-रत्नागिरी’ ही गाडी कोकणातील चाकरमान्यांची जीवनवाहिनी मानली जाते. मात्र, ही गाडी दादरऐवजी ‘दिवा’ स्थानकावरून सोडण्याचा निर्णय घेतला जात असल्याची चर्चा आहे. त्याचवेळी दादरहून उत्तर भारतासाठी नवीन ट्रेन सुरू करण्याचा प्रस्ताव असल्याचे समोर येत आहे.
⚠️ देशपांडेंचा घणाघात
याबाबत बोलताना संदीप देशपांडे म्हणाले,
“कोकणच्या माणसाचा हक्क हिरावून परप्रांतीयांचे लाड पुरवले जात आहेत. कोकणातील प्रवासी अवजड सामान घेऊन गर्दीच्या लोकलने दिव्यापर्यंत कसा जाणार? रेल्वे प्रशासन जाणीवपूर्वक मराठी माणसाचा छळ करत आहे.”
🚩 मनसेचा आंदोलनाचा इशारा
“हा निर्णय तातडीने मागे घेतला नाही आणि दादर-रत्नागिरी गाडी पूर्ववत सुरू ठेवली नाही, तर मनसे स्टाईलने आंदोलन केले जाईल,” असा थेट इशाराही त्यांनी दिला.
दरम्यान, या निर्णयामुळे कोकणवासीयांमध्ये संतापाची लाट उसळली असून सोशल मीडियावरही रेल्वे प्रशासनाविरोधात तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत.










