अकोला, दि. २३ : ‘वंदे मातरम’ या राष्ट्रभावना जागवणाऱ्या गीताला दीडशे वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने अकोला जिल्ह्यात विविध ठिकाणी उत्साहात सामूहिक गायन कार्यक्रम आयोजित करण्यात आले. जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवनातही ‘वंदे मातरम’चे सामूहिक गायन करण्यात आले.
यावेळी भगतसिंग, राजगुरू व सुखदेव यांच्या स्मृतीदिनानिमित्त त्यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
कार्यक्रमास अपर जिल्हाधिकारी प्रमोद गायकवाड, मनपा आयुक्त डॉ. सुनील लहाने, निवासी उपजिल्हाधिकारी गजेंद्र मालठाणे यांच्यासह जिल्ह्यातील तहसीलदार उपस्थित होते.
‘वंदे मातरम’ या गीताने स्वातंत्र्यलढ्यात जनमानसात देशभक्तीची भावना चेतविण्यात महत्त्वाची भूमिका बजावली असून ते स्वातंत्र्यलढ्याचा आत्मा ठरले, अशी भावना उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केली. आजही हे गीत युवकांसाठी प्रेरणादायी असून देशप्रेमाची ज्योत प्रज्वलित ठेवणारे आहे, असेही त्यांनी नमूद केले.










