अचूक नियोजन व काटेकोर अंमलबजावणी आवश्यक – जिल्हाधिकारी वर्षा मीना
अकोला, दि. २३ : जनगणना संचालनालय व जिल्हाधिकारी तथा प्रधान जनगणना अधिकारी यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्ह्यातील अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी जनगणनाविषयक तीन दिवसीय विशेष प्रशिक्षण शिबिराचा प्रारंभ आज नियोजन भवनात झाला. यावेळी जनगणना कक्षाचाही शुभारंभ करण्यात आला.
जिल्हाधिकारी वर्षा मीना यांनी सांगितले की, विविध लोककल्याणकारी योजनांच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी अचूक जनगणना अत्यंत महत्त्वाची असते. त्यामुळे माहिती संकलन करताना कोणतीही नोंद सुटणार नाही आणि पुनरावृत्ती होणार नाही, याची विशेष काळजी घेणे आवश्यक आहे.
प्रशिक्षणातून जनगणना प्रक्रियेतील प्रत्येक बाब समजून घेऊन त्याची काटेकोर अंमलबजावणी करण्याचे निर्देशही त्यांनी यावेळी दिले.
यावेळी अपर जिल्हाधिकारी प्रमोद गायकवाड, मनपा आयुक्त डॉ. सुनील लहाने, निवासी उपजिल्हाधिकारी गजेंद्र मालठाणे, सूचना विज्ञान अधिकारी अनिल चिंचोले, सहायक संचालक (जनगणना) प्रवीण भगत, ऋषीकेश पाठारे तसेच जिल्हा प्रशिक्षक वैभव फरतारे आदी उपस्थित होते.
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नूतन इमारतीतील दुसऱ्या मजल्यावर जनगणना कक्ष स्थापन करण्यात आला असून, या कक्षाद्वारे जनगणना प्रक्रियेचे सनियंत्रण व समन्वयन करण्यात येणार आहे.










