तळेगाव दाभाडे (प्रतिनिधी) : समाजकार्यातून आदर्श निर्माण करणारे तळेगाव दाभाडे येथील ख्यातनाम समाजसेवक विजय कदम यांना यंदाचा प्रतिष्ठित ‘भारतरत्न डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम राष्ट्रीय जीवनगौरव पुरस्कार २०२६’ जाहीर झाला आहे. ए.डी. फाउंडेशन, महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने या पुरस्काराची घोषणा करण्यात आली.
समाजकार्यातील देदीप्यमान प्रवासाचा गौरव
विजय कदम यांनी गेल्या अनेक वर्षांपासून समाजनिर्मिती आणि जनकल्याणासाठी दिलेले योगदान उल्लेखनीय मानले जाते. त्यांच्या अष्टपैलू कार्याची दखल घेत फाउंडेशनने त्यांची या सन्मानासाठी निवड केली आहे. “समाजात नवचैतन्य निर्माण करून दीपस्तंभासारखे कार्य करत समाजाला नवी दिशा देण्याचे काम विजय कदम यांनी केले आहे,” असे प्रशस्तीपत्रात नमूद करण्यात आले आहे.
पुरस्कार सोहळ्याची तयारी
या राष्ट्रीय गौरव सोहळ्याचे आयोजन फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष अशोक गोरड व कार्याध्यक्ष महादेव महानोर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात येणार असून मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार प्रदान केला जाणार आहे.
भावना व्यक्त करताना…
“हा पुरस्कार माझ्या एकट्याचा नसून माझ्या सहकाऱ्यांचा आणि मला प्रेरणा देणाऱ्या सर्वांचा सन्मान आहे,” असे विजय कदम यांनी नमूद केले.
अभिनंदनाचा वर्षाव
हा पुरस्कार जाहीर झाल्यानंतर तळेगाव दाभाडे परिसरासह विविध सामाजिक स्तरातून विजय कदम यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत असून त्यांच्या पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या जात आहेत.



