केळापूर (प्रतिनिधी) : पाटनबोरी येथे श्री स्वामी समर्थ महाराज प्रगट दिन महोत्सव श्री स्वामी समर्थ प्रतिष्ठानतर्फे कै. आबासाहेब तायडे सभागृहात भक्तिमय वातावरणात उत्साहात साजरा करण्यात आला.
कार्यक्रमाची सुरुवात प्रतिष्ठानचे अध्यक्ष जयंत भागानगरकर यांच्या निवासस्थानापासून स्वामींच्या पादुकांची भजन दिंडी व पालखी मिरवणुकीने करण्यात आली. परंपरेनुसार पालखी उचलण्याचा मान महिलांना देण्यात आला. टाळ-मृदुंगाच्या गजरात व नामस्मरणात ही पालखी मुख्य मार्गाने कार्यक्रम स्थळी पोहोचली.
कार्यक्रम स्थळी प्रतिष्ठानचे सचिव तसेच सभागृहाचे अध्यक्ष डॉ. चंद्रकांत तायडे व त्यांच्या सहकाऱ्यांनी पालखीवर पुष्पवृष्टी करून दिंडीतील भाविकांचे पाय धुऊन स्वागत केले. त्यानंतर अवतरणिका, पाठ, जप, आरती आदी धार्मिक कार्यक्रम भक्तिभावात पार पडले.
यानंतर महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले. सुमारे तीन तास चाललेल्या महाप्रसादाचा लाभ सुमारे ७०० ते ८०० भाविकांनी घेतला.
हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी जयंत भागानगरकर यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ. चंद्रकांत तायडे, शिवदास गंपावार, डॉ. संतोष नार्लावार, माधवराव अर्गुलवार, सौ. संध्या भागानगरकर, श्रीकांत बोडेवार, सचिन जोशी, विनोद कनाके, राम भांदकर, सौ. मीनाताई मुंजेकर, आदित्य भागानगरकर, सुधाकर दरलावार, सारंग जोशी, जयंत बावणे, निखिल शहाकार, अरविंद भटकर, गंगाराम शिरगुरुवार यांच्यासह अनेक सेवेकऱ्यांनी परिश्रम घेतले.




