माहूर (प्रतिनिधी) : तालुक्यातील मौजे मुरली येथे शेतात जाणाऱ्या रस्त्याच्या वादावर अखेर तोडगा निघाला असून तहसीलदार अभिजित जगताप यांच्या तातडीच्या हस्तक्षेपामुळे अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेला प्रश्न निकाली काढण्यात आला आहे. त्यामुळे संबंधित शेतकऱ्यांमध्ये समाधान व्यक्त होत आहे.
मौजे मुरली येथील शेतकरी जीवन नारायण शिंदे व प्रकाश नारायण शिंदे यांच्या गट क्रमांक १६६ मधील शेतात बैलगाडीने ये-जा करण्यासाठी रस्ता उपलब्ध नसल्याने त्यांनी तहसील कार्यालय माहूर येथे गट क्रमांक १६५ व १८१ मधून रस्ता देण्याची मागणी केली होती.
या प्रकरणाची दखल घेत तहसीलदार अभिजित जगताप व तलाठी साहेबराव गावंडे यांनी २४ रोजी प्रत्यक्ष जागेवर भेट देऊन पाहणी केली. यावेळी गट क्रमांक १६५ व १८१ चे मालक कमलाबाई बाबाराव सूर्यवंशी व साहेबराव माधवराव सूर्यवंशी यांचे समुपदेशन करण्यात आले.
समुपदेशनानंतर संबंधित जमीनमालकांनी जीवन शिंदे व प्रकाश शिंदे यांच्या शेतासाठी बैलगाडी रस्ता देण्यास संमती दिल्याने दीर्घकाळ प्रलंबित असलेला वाद निकाली निघाला. तसेच दोन्ही पक्षांनी एकमेकांविरुद्ध न्यायालयात दाखल केलेले खटले मागे घेण्याचेही कबूल केले.
दरम्यान, गट क्रमांक १६५, १६६ व १८१ यांची सर्वांच्या संमतीने उपअधीक्षक भूमी अभिलेख, माहूर यांच्या मार्फत मोजणी करण्याचे ठरविण्यात आले आहे.
यावेळी कमलाबाई सूर्यवंशी, बाबाराव सूर्यवंशी, संदीप सूर्यवंशी, जीवन शिंदे, प्रकाश शिंदे आदी उपस्थित होते. अनेक दिवसांपासून सुरू असलेला वाद तातडीने मिटल्याने शेतकऱ्यांनी महसूल प्रशासनाचे आभार व्यक्त केले.









