शहादा (प्रतिनिधी) : महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषद, मुंबई यांच्या वतीने राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांमधील सुमारे १५ लाख मुलींसाठी राणी लक्ष्मीबाई आत्मरक्षा अभियान राबविण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
या अभियानाला प्रतिसाद देत नंदुरबार जिल्ह्यातील अक्कलकुवा तालुक्यातील जिल्हा परिषद शाळा, गुलीउंबर येथे विद्यार्थिनींसाठी स्वसंरक्षण प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले. जागतिक महिला दिन निमित्त या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
सध्याच्या काळात मुलींना शारीरिक व मानसिकदृष्ट्या सक्षम करणे अत्यंत आवश्यक असल्याने या अभियानांतर्गत विद्यार्थिनींना स्वसंरक्षणाची विविध तंत्रे व धडे देण्यात आले. कराटे व इतर संरक्षण कौशल्यांचे प्राथमिक प्रशिक्षण देत संकटकाळात स्वतःचा बचाव कसा करावा, याबाबत मार्गदर्शन करण्यात आले.
या कार्यक्रमात कस्तुरबा गांधी बालिका विद्यालय, मोहिदे येथील मुख्याध्यापिका नीलिमा लक्ष्मण पाटील यांनी विद्यार्थिनींना मार्गदर्शन केले. तसेच जिल्हा समन्वयक दीपक पाठक, प्रमिला पाटील, शाळेचे शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
या उपक्रमामुळे विद्यार्थिनींमध्ये आत्मविश्वास वाढत असून नंदुरबार जिल्ह्यातील विविध शाळांमध्ये हा अभियान प्रभावीपणे राबविला जात असल्याचे शिक्षकांनी सांगितले.







